ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असून, त्यांचा गट आता भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, यावरुनच आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खोचक ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
“कब तक छिपोगे गोहातीमे.. आना ही पडेगा.. चौपाटीमे…”, असे म्हणत संजय राऊत यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा भन्नाट फोटो ट्विट केला आहे. कधीपर्यंत गुवाहाटीत लपून बसणार आहात, चौपाटीवर म्हणजे मुंबईत यावे लागेलच, अशा शब्दात राऊत यांनी बंडखोरांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या 40 हून अधिक असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या गटाने आव्हान दिले आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून होत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हिंदुत्व ही गोष्टी फक्त तोंडी लावायला आहे. मनाप्रमाणे गोष्टी घडाव्या म्हणून हे बंड करण्यात आले आहे. लालसा, महत्त्वकांक्षा, आमिष ही बंडाची सूत्र आहेत, असेही काल संजय राऊत यांनी म्हटले होते.