साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा उत्सव आज देशभर हर्षोल्हासात साजरा होत आहे. मागची दोन ते अडीच वर्षे भारतीयांसाठी अत्यंत कसरतीची राहिली असली, तरी हिंदू नववर्षारंभी घरोघरी उभारली जाणारी गुढ्यातोरणे प्रत्येकाच्या जीवनात नवी उमेद, आनंद निर्माण करतील, यात तीळमात्र संदेह वाटत नाही. भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. महाप्रलयानंतर ब्रम्हदेवाने याच दिवशी विश्वाची उत्पत्ती केली, असा उल्लेख ब्रम्हपुराणात आढळतो. तर रावणाचा वध केल्यानंतर चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्री राम अयोध्येत परतले आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी अयोध्यावासियांनी गुढ्या, तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले, अशी आख्यायिका आहे. तर प्रतिष्ठान म्हणजे आजची पैठणनगरी राजधानी असलेल्या सातवाहन राजाने याच दिवशी आपल्या प्रजेमध्ये चैतन्य फुंकल्याचा इतिहास सांगतात. त्यामुळे शालिवाहन शकाचा हाच आरंभबिंदू. तेव्हापासूनच मराठी कालगणना सुरू झाली असून, सातवाहन राज्यातील महाराष्ट्रालगतच्या गुजरात, कर्नाटक, आंध्रमध्येही हीच कालकणना प्रचलित असल्याचे दिसते. अर्थात काही ठिकाणी हा दिवस युगादी या नावानेही साजरा होतो. यंदाच्या पाडव्याला शालिवाहन शक 1945 सुरू होत असून, शोभन नावाच्या संवत्सरास प्रारंभ होत आहे. हे शुभसूचकच ठरावे. पाडवा आणि वसंत यांच्यातील नाते तर अनोखेच म्हणता येईल. वास्तविक चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची सुरम्य चाहूल होय. शिशिरातील पानगळीनंतरचा हा टप्पा म्हणजे निसर्गाचा अद्भूत चमत्कारच जणू. एकीकडे सूर्यकिरणे प्रखर होत असताना दुसऱ्या बाजूला चैतन्याचा बहर दाटून येतो. पर्णहीन झाडे चैत्रपालवीने डवरतात. पळस, चाफा, बहावा अशा कितीतरी मनमोहक झाडांवर फुले फुलू, झुलू लागतात. या साऱ्या फुलोऱ्याचा उगमस्रोत म्हणजे पाडव्याचा दिनु. प्राणी, पशू, पक्ष्यांसह सर्व सजीवसृष्टीला निसर्गाच्या विविध रंगात न्हाऊन टाकण्यासाठी हा दिवस यंदाही सज्ज झाला आहे. अर्थात या वर्षी निसर्ग कूस बदलताना दिसतो. होळीपासून ते पाडव्यापर्यंतचा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची सुऊवात. याच कालावधीत उन हळूवारपणे चढत जाते. परंतु, मागच्या पंधरा दिवसांतील चित्र हे याच्या विपरितच भासावे. या काळात निसर्गाने दाखविलेले विविधरंग स्तिमित करणारेच ठरावेत. दिवसा कडक उन्हाळा, सायंकाळी गारपीट, अवकाळी पाऊस, सकाळी वा रात्रीच्या सुमारास थंडी अशा बदलत्या ऋतूमानाला मागच्या काही दिवसांत सामोरे जावे लागते आहे. अवकाळीचे हे संकट अद्यापही कायम असून, यात गहू, हरभरा, टोमॅटो, फळभाज्या, कांदा, द्राक्ष, केळी, संत्रा यांसारख्या पिकांना जबर फटका बसल्याचे पहायला मिळते. महाराष्ट्रासारख्या भागात तर रोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात पाऊस होत असून, शेती व शेतकऱ्यांच्या नुकसानीला गणतीच राहिलेली नाही. त्यात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनाम्यातही अडथळे उद्भवले. आता संप मिटल्यानंतर पंचनामादी सोपस्कार आटोपून लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचविता येईल, बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू कसे पुसता येतील, हे सरकारने पहायला हवे. आपली संस्कृती खऱ्या अर्थाने टिकविण्याचे काम बळीराजाने केले आहे. त्यामुळे जगाच्या पोशिंद्याचा सण भकास जाऊ नये, याची काळजी आपण घ्यायला हवी. मागची दोन ते अडीच वर्षे कोरोनाशी झुंजण्यात गेली. आता पुन्हा साथीचे आजार डोके वर काढताना दिसतात. तथापि, त्यांना न घाबरता करारी बाण्याने त्यांच्याशी लढावे लागेल. मुळात गुढीपाडवा हा आरोग्याचे महत्त्व सांगणारा सण मानता जातो. या दिवशी कडुनिंब, गूळ, धने व इतर घटक एकत्र करून तयार केलेल्या जीवनरसाचे सेवन करण्याची प्रथा आहे. आयुर्वेदात कडुनिंबाचे महत्त्व अनन्यसाधारण होय. बदलत्या हवामानात सर्दी, कफजन्य विकारांवर कडूनिंब गुणकारी आहे. त्याचबरोबर तो शीत प्रकृतीचा असल्याने उष्णतेच्या विकारांकरिता पोटात घेणेही लाभदायक ठरते. रक्तशुद्धी, त्वचाविकारासह विविध आजारांवर रामबाण उपाय असलेल्या कडूनिंबासोबत गूळ व धणे खाण्याचेही अनंत फायदे आहेत. स्वाभाविकच नव्या वर्षात पदार्पण करीत असताना निरोगी जीवनाचा जागर करणेही क्रमप्राप्त ठरते. बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण यामुळे आज मानवी जीवन विविध आजारांच्या चक्रव्यूहात अडकल्यासारखी स्थिती आहे. हे पाहता योग, प्राणायामयुक्त जीवनशैलीसोबतच आरोग्य साक्षर होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावयास हवा. महागाई, लोकसंख्यावाढ, फुटीरतावाद, धर्मांधता अशा बहुविध समस्याही आपल्यापुढे आ वासून उभ्या आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईच्या आलेखाने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. स्वयंपाकाच्या गॅसपासून ते गहू, तांदळापर्यंत प्रत्येक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. कुणी काहीही म्हटले, तरी पैशाचे सोंग आणता येत नसते. अर्थात आर्थिक बाजू कितीही कमकुवत असली, तरी प्रत्येक सण आनंदात व जल्लोषात साजरा करण्याची आपली परंपरा आहे. ही परंपरा यंदाही नक्कीच पाळली जाईल. परंतु, नववर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महागाईच्या चक्रातून सामान्यांची मुक्तता होणे, हे आवश्यक ठरते. खलिस्तानच्या मुद्द्याने वर काढलेले डोके, ही चिंताजनक बाब असली, तरी पंजाबमधील आप व केंद्रातील भाजप सरकारने आपापसांतील मतभेद बाजूला ठेवत अतिशय संवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळला पाहिजे. अमृतपाल सिंग वा अन्य खलिस्तान समर्थकांचा बंदोबस्त करण्यात कोणतीही कसर नको. मुळात पाडवा, हे समृद्धीबरोबरच विजयाचेही प्रतीक आहे. त्यामुळे अशा फुटीरतावादी प्रवृत्ती देशाच्या अखंडतेला धोका उत्पन्न करत असतील, तर त्यांना त्यांची जागा वेळीच व तत्पर दाखवावीच लागेल. पाडवा म्हणजे दु:ख बाजूला ठेऊन आनंदाची पखरण करण्याचा मंगलमय दिवस. त्यामुळे परस्परांबद्दल प्रेम, आदर बाळगत आनंदाची, समृद्धीची, निरोगी आयुष्याची, सहकार्याची, मानवतेची गुढी उभारण्यासाठी सर्व जण पुढे येऊयात.
Previous Articleअर्थसंकल्पीय अधिवेशन गोंधळातच संपण्याची चिन्हे
Next Article ‘अमूल’ एफएमसीजी बाजारात उतरण्याच्या तयारीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.