शंभर वर्षांपूर्वीची घटना, औंधच्या राजाकडून गंभीर दखल, या घटनेने रोवले औंधच्या संग्रहालयाचे बीज
मानसिंगराव कुमठेकर / मिरज
सुमारे 110 वर्षांपूर्वी कुंडलमधील गमलेश्वराच्या मंदिरात असणारा शिलालेख नागरिकांनी फोडून तो मंदिराच्या पायात घातला. ही गोष्ट तत्कालीन औंध संस्थानचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांना समजताच हे अस्वस्थ झाले. त्यांनी तात्काळ संस्थानात जाहीरनामा प्रसिध्द करून जुने शिलालेख, जुन्या वस्तू जतन करण्याचे आदेश दिले. यातूनच औंधच्या संग्रहालयाची बीजे रोवली गेली. सदरचा जाहीरनामा नुकताच उजेडात आला असून मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहे.
देशात अनेक प्राचीन लेणी, मंदिरे, किल्ले, शिलालेख, वीरगळ, समाध्या व अन्य ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंची नेहमी हेळसांड होते. अज्ञान आणि अनास्था यामुळे या वास्तूंची तोडफोड होते. या वास्तूंच्या जतनासाठी शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर प्रयत्न होत असले तरी ते अपुरे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन राजांनी अशा वास्तू जतन करण्याचे, त्यासाठी स्वतंत्र संग्रहालये निर्माण करण्याचे कार्य केले.
सुमारे 110 वर्षांपूर्वी तत्कालीन औंध संस्थानात असणाऱया कुंडल गावातील गमलेश्वर मंदिरात प्राचीन शिलालेख होता. या शिलालेखाबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ होते. हा शिलालेख ऐतिहासिक ठेवा आहे, याची कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी मंदिराचा जीर्णोध्दार करताना हा शिलालेख फोडून तो मंदिराच्या पायात घातला. ही माहिती औंध संस्थानचे कलाप्रेमी आणि इतिहासप्रेमी राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांना समजली. ऐतिहासिक शिलालेख फोडल्याचे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी तात्काळ संपूर्ण संस्थानात जाहीरनामा प्रसिध्द करून असे शिलालेख, समाध्या व अन्य ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर असे लेख गोळा करून ते सरकार दरबारी पाठविण्याच्याही सूचना दिल्या.
बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी 25 मे सन 1912 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात ते म्हणातात, ‘संस्थानात जुनी देवालये, जुन्या भव्य सार्वजनिक इमारती, वृंदावने, शिलालेख, कोरीव लेणी, मूर्ती, कारागिरीच्या वस्तू ज्या ज्या ठिकाणी असतील तर त्या खराब करू नयेत. कोणी मोडू नयेत. त्यावर असलेले लेख कायम रहावेत, असा बंदोबस्त राहणे जरूर आहे. करीता अशा इमारती, वृंदावने, सिलालेख, वगैरे कोणते गावी काय आहेत, हल्ली कोणत्या स्थितीत आहेत. याचा खुलासेवार तक्ता करून पाठवावा. सदरहू माहिती देताना सदरहू इमारत, देवालय, शिलालेख कोणते काळचे आहेत, कोणी किती वर्षांपूर्वी बांधला, लिहिला वगैरे शक्य तितकी माहिती मिळवून खुलासा करावा. यापुढे असे कारागिरीचे व कौशल्याचे पदार्थ कोणी भंग करू नयेत, जो कोणी करील त्याजवर रितीप्रमाणे खटले करण्यात येतील,’ असा इशारा या जाहीरनाम्यात देण्यात आला आहे.
सदरच्या जाहीरनाम्यानंतर गावोगावी असणारे शिलालेख, वीरगळ, व अन्य वस्तूंची माहिती राजांना देण्यात आली. कुंडलमधील शिलालेख फोडण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून राजांनी संस्थानातील सर्व शिललेख एकत्र केले. ते औंध येथे आणले. यातूनच औंधच्या संग्रहालयाचे बीज रोवले गेले. आजही हे शिलालेख औंध संग्रहालयात पाहावयास मिळतात. कुंडलमधील एका घटनेने जागृत राजाने ऐतिहासिक दुर्मिळ वस्तूंच्या जतनाबाबत केलेल्या उपाययोजना आजही मार्गदर्शक ठरणाऱया आहेत.