कलियुगात प्रत्येक जण स्वतः पुरतंच जगत असल्याने मी कसा पुढे जाईन याचाच विचार करत असतो. एखाद्या संगीत खुर्चीच्या खेळात, शेवटपर्यंत मलाच खुर्चीत बसता यावं किंवा मलाच ती खुर्ची मिळताना दुसरे बाद झाले तरी चालतील असाच विचार करत जगत असतो. पण एका गावात मात्र सगळय़ांना शेवटपर्यंत खुर्चीवर बसता येईल असा वेगळाच खेळ खेळला गेला त्याची ही गोष्ट.
छत्तीसगडमधल्या बस्तर भागात इंद्रावतीच्या जवळ जंगलाच्या बाजूला असलेल्या गावात दुष्काळ पडला. सलग दोन वर्ष शेतात काहीच पिकलं नाही, गुरांना वैरण नाही, पोरांना एकवेळचं कसंबसं खायला मिळायचे, अशा वेळेस कसली दिवाळी अन कसले सण? लोक दिवस ढकलत होते. पोरं उनाडक्मया करत जंगलात काही खायला मिळतं का? शोधत फिरायचे. या गावातलं फक्त एकच घर तेवढं मजेत जगत होतं. या घरातला माणूस जंगलातल्या वस्तू विकायचा एवढच माहिती होतं. पोरांना मदतीला घेऊन काहीबाही काढून घ्यायचा. त्याच्या बदल्यात खाऊ मिळायचा. पण एक दिवस गावातल्या पोरांनी याचं कारण शोधायचं ठरवलं. हा माणूस कोणत्या भागातून काय मिळवतो याच्यावर पाळत ठेवली, तो कुठे जाऊन काय, कितीला विकतो याचा शोध घेतला. आपल्या मोडक्या सायकली घेतल्या आणि गेले त्याच्या मागावर. सगळं शोधून काढलं आणि लगेच लागले कामाला. या भागात चारोळीचं उत्पन्न मोठय़ा प्रमाणात होत असे. पण या लोकांना त्याचा थोडासाच मोबदला देऊन व्यापारी श्रीमंत होत होते. यावर उपाय म्हणून मुलांनी त्या चारोळय़ा स्वतः गोळा करून पिशव्या भरून घेतल्या अन् तालुक्याचं गाव गाठलं, आणि आपल्या मालाची उत्तम विक्री केली. उत्तम चारोळीचा ब्रॅण्ड नावारूपाला आला. चांगली किंमत मिळाली. गावासाठी रोजगाराची खात्रीच मिळाली.
गेले कितीतरी दिवस अनेक घरात चूल पेटली नव्हती. पोरांनी या पहिल्या पैशातून लगेच तांदुळ आणि बेसन पीठ खरेदी केलं. ओळखीच्या माणसांबरोबर पुढे बैलगाडीतून पाठवून दिलं आणि आयांना जेवण बनवायला सांगितले. आता पोरं निघाली सायकली घेऊन गावाकडे. सगळा गाव चावडीवर जमा झाला. वीस पंचवीस उंबऱयाचं गाव गोल करून पीठलं भाताचं पोटभर जेवण करत होतं, अधूनमधून डोळे पुसत होतं. पोरांच्या तोंडावर हात फिरवून कडाकड बोटं मोडत होतं.जेवण झाल्यावर पोरांनी या चारोळी व्यवसायाची माहिती गावकऱयांना सांगितली. दुसऱया दिवसापासून सगळय़ाच हाताला काम मिळालं होतं. जगण्याच्या नवीन वाटा मिळाल्यामुळे सगळय़ांना मोठ्ठ समाधान मिळालं होतं. त्या लबाड, स्वार्थी माणसाला मात्र गावातून पळून जायचीच वेळ आली. सगळय़ांना जगण्याच्या संगित खुर्चीवर बसायला मिळणार याची खात्री मिळाल्याने तो दिवस या सगळय़ांसाठी खऱया अर्थाने दिवाळीचा ठरला. पिठलं भाकरीचा फराळ अमृताची गोडी देऊन गेला, झाडांवर काजव्यांच्या पणत्या शांतपणे तेवत होत्या, शेतावरची जुनी आंब्याची झाडं आणि बांधावरचे झेंडू तोरणासाठी सजले होते. आकाशात चांदण्या आणि धूमकेतू आतशबाजी करत होते आणि गावातल्या प्रत्येकाच्या डोळय़ात समाधानाच्या फुलबाज्या फुलल्या होत्या.
-सौ. अद्वैता उमराणीकर