मुदतबाह्या अन्नधान्य पाकिटांचे वाटप, सेविकांनी जागरुक राहणे गरजेचे
बेळगाव : अंगणवाडी केंद्रांमध्ये मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच लहान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. बालकांचे कुपोषण दूर होवून पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या पोषण आहाराच्या दर्जालाच हरताळ फासण्याचा प्रकार समोर आला आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहाराची मुदत एक महिन्याआधीच संपली आहे. अशी अन्नधान्यांची पाकिटे पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या आहाराबाबत खळबळ माजली आहे. अंगणवाडी केंद्रांतील आहाराबाबत सातत्याने तक्रारी येत असतात. आहाराच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असतात. तर मुदतबाह्य अन्नधान्याची पाकिटे वाटप केल्याचा प्रकार घडला आहे. जिल्ह्यात 5 हजार 531 लहान-मोठी अंगणवाडी केंद्रे आहेत. या अंगणवाडी केंद्रांना शासनाच्या पोषण आहार योजनेंतर्गत आहाराचा पुरवठा केला जातो. गूळ, शेंगा, विविध कडधान्य यासह धान्याची पाकिटेही वितरीत केली जातात. यामध्ये धान्यांच्या पाकिटांची एक्स्पायर्ड झाली आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत भीती व्यक्त होत आहे.
अंगणवाडी सेविकांनी जागरुक राहणे आवश्यक
अंगणवाडी केंद्रांना मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील सेविकांनी पोषण आहारावरील मुदत पाहूनच पोषण आहार द्यावा. पोषण आहाराबाबत जागरुक रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पोषण आहार शिल्लक
अंगणवाडी केंद्रांना मे महिन्यात सुटी देण्यात आली होती. दरम्यान काही पोषण आहार शिल्लक राहिला आहे. असा आहारच काही ठिकाणी पुरविला जात असल्याचे दिसत आहे. मुदतबाह्य आहार पुरविणे चुकीचे आहे. मात्र काही ठिकाणी हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांतील मुदतबाह्य पोषण आहाराबाबत चर्चा सुरू झाली आहे.