वार्ताहर /धामणे
राजहंसगड गावात सुरू असलेले घरोघरी नळपाणी योजनेचे काम गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सुरू असून त्यामुळे गावातील प्रत्येक गल्लीत चिपींग आणि पेवर्सचे ढिगारे मारुन ठेवल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने येथील नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राजहंसगड हे गाव सुळगा (येळ्ळूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असून या गावातील प्रत्येक गल्लीत काँक्रेटीकरण यापूर्वीच करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गल्लीत दुतर्फा पेवर्स घालण्यात आले आहेत. हे पेवर्स काढून शासनाकडून मंजूर झालेल्या प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्याच्या नळजोडणीचे काम ग्रामपंचायतच्या देखरेखीखाली सुरू आहे. या कामाची सुरुवात गेल्या अडीच महिन्यापूर्वी झाली असून हे काम करणारा ठेकेदार काम कसे होत आहे आणि रोज किती काम होत आहे, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार या गावातील नागरिकांनी केली आहे. याच गावातील सुळगा (ये.) ग्रामपंचायतला अध्यक्ष व उपाध्यक्ष असूनसुद्धा हे काम करण्यास दिरंगाई का होत असल्याचा प्रश्न गावकऱ्यांना लागून राहिला आहे. ग्रामपंचायतीने याकामी जातीने लक्ष पुरवून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्यावर रहदारीला होणारा त्रास दूर करून येथील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांतून आता जोर धरु लागली आहे..