‘एनएसए’ लावून तुरुंगात डांबण्याची काँग्रेसची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंडीच्या भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावर टीका करत पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक हिंसाचार पसरवत असल्याचे म्हटले आहे. शेतकरी आंदोलनावेळी सीमेवर हत्या होत होत्या. केंद्र सरकारने शेतकरी विधेयक मागे घेतले नसते तर आंदोलकांनी देशात हिंसाचार माजवला असता, असे विधान केले आहे. या विधानावरून त्यांना अटक करून तुऊंगात पाठवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कंगना राणौतने शेतकरी आंदोलनाबाबत दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर पंजाबचे माजी मंत्री राजकुमार वेरका यांनी कंगना राणौतवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) गुन्हा दाखल करून आसाममधील दिब्रुगड तुऊंगात पाठवण्याची मागणी केली आहे. मात्र, कंगना राणौतच्या या वक्तव्यापासून पंजाब भाजपने स्वत:ला दूर केले आहे. पंजाबचे भाजपचे वरिष्ठ नेते हरजीत ग्रेवाल यांनी कंगनाचे ते वैयक्तिक विधान आहे, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले.
खासदार कंगना राणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वादग्रस्त भाष्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी आमचे केंद्रातील सरकार मजबूत नसते तर शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबचा बांगलादेश व्हायला वेळ लागला नसता, असे म्हटले आहे. तसेच आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. कंगना राणौत यांनी यापूर्वीही अनेकदा शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत.