पुणे : सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना देण्यात आली आहेत. यापूर्वीही ईडीकडून चौकशी झालेली आहे. मात्र, पुन्हा एकदा शिळ्या कढीला ऊत आणून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आम्ही किरीट सोमय्यांना उत्तर देणार नाही. यंत्रणा चौकशी करेल आणि त्यातून सत्य बाहेर येईल, असे राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते राज्यातील पहिली ई-बस ‘शिवाई’चे आणि पहिल्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अनिल परब माध्यमांशी बोलत होते. परब म्हणाले, ज्या एजन्सी आहेत, जिथे सोमय्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारात जे अधिकारी मला प्रश्न विचारत आहे, त्याचे उत्तर आम्ही देत आहोत. परंतु, ही नौटंकी गेल्या वर्षभरापासून चालू आहे आणि त्याला उत्तर देण्यास मी काही बांधिल नाही. त्याने यंत्रणेकडे तक्रार करावी. यंत्रणा याची चौकशी करेल आणि जे काही सत्य आहे, ते बाहेर येईल. विभास साठे यांची जमीन मी खरेदी केली आणि नंतर विकली. माझा व्यवहार अतिशय पारदर्शक आहे. ज्यांनी रिसॉर्ट बांधले, त्यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे. सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना देण्यात आली आहेत.
वर्षभरात 3 हजार ई-बसेसचे नियोजन
आज एसटी महामंडळाने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पहिली बस ही पुणे ते नगर आणि नगर ते पुणे धावली होती. तशीच आज येथूनच राज्यातील पहिली ई बस ‘शिवाई’ नावाने सोडण्यात आली आहे. राज्यातील पर्यावरणाचा विचार करता ‘एसटी’ने इलेक्ट्रिक बस जास्तीत जास्त घेण्याचा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा पर्याय निवडला आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. आजच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत शिवाई बस सुरू करण्यात आली आहे. तसेच सरकारी योजनेत आधी 150 बसेस या महामंडळात येणार आहेत. तसेच वर्षभरात 3 हजार बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परब यांनी दिली.