ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्या सरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा आज मुहूर्त मिळाला. एकूण १८ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर आता राजकीय आणि सामाजित वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh) यांनी संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याने त्यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही राज्य सरकराच्या मंत्रीमंडळ विस्तारावर ट्विट करत टीका केली आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतेलेल्या दोन मंत्र्यांवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये त्यांनी संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी केला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झालेले आणि त्यामुळेच ठाकरे सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा नव्या सरकारमध्ये समावेश झाल्यामुळे त्यावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. तर, टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलींची प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांच्याही नावावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. दमानियांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्याला मंत्रीपद देणं अत्यंत दुदैवी-चित्रा वाघ
“दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रीपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रीपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी”, असं दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये राज्य मंत्रीमंडळामध्ये एकाही महिलेला मंत्रीपद मिळालेलं नसल्याचा आक्षेप घेतला आहे. “एकही स्त्री मंत्रीपदासाठी योग्य नाही?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
हे ही वाचा : मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही, राज्याच्या स्त्री शक्तीवर हा अन्याय -सुप्रिया सुळे