दीपक प्रभावळकर, राजेंद्र वारागडे / लोणंद :
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास साऱ्या विश्वाला अभिमानाचा ठरतोय. यंदा या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून येत आहे. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस मानवी इतिहासाची अती प्राचिन संस्कृती असणाऱ्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा दिवस ठरला. या अती प्राचिन संस्कृतीच्या पोटात करोडो घटना लपल्यात. 1947 ला स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तो 1942 च्या लढ्यामुळे. ‘चले जाव‘ ही केवळ चळवळ नव्हती तर या उठलेल्या आगडोंबाच्या गर्भात तो स्वातंत्र्याचा सूर्य होता. हा आगडोंब उठला तो भारतातील तीन जिल्हय़ात अन् त्यातला अग्रणी जिल्हा होता तो सातारा. स्वातंत्र्याचा गर्भ निर्माण करणाऱ्या या आगडोंबातली ‘शेवटची‘ ज्वाला आजही धगधगते आहे…. हो शेवटची ज्वाला ! 1942 ला अग्रणी राहिलेल्या सातारा जिल्हय़ातील आज जिवंत असलेल्या एकमेव स्वातंत्र्यसैनिकाची ही कहाणी आहे… इंग्रजांच्या गोळय़ा झेललेलं एकमेव शरीर ते सारं थरारक आणि साऱ्या जगाला थक्क करणाऱया घटना सांगत आहे. यांच्या पश्चात हिंदूस्थानला स्वातंत्र्य मिळवून देणारी आख्खी पिढी संपणार आहे. म्हणून भारतीय स्वातंत्र्याला… त्या पिढीला… आणि शेवटच्या ज्वालेला…. सलाम करूयांत…. वयाने 98 वर्षाचे असलेल्या शेवटचे स्वातंत्रसैनिक अण्णा सापतेंच्या पायी आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहुर्तावर मस्तक ठेऊयांत !
स्वातंत्र्यापूर्वीचा धगधगता काळ; प्रतिसरकार
इंग्रजांच्या गुलामीत दिडशे वर्षे काढल्यानंतर स्वातंत्र्याची आस आता परमसिमेवर होती. देशभर इंग्रजांच्या निष्ठुरतेचा कळस गाठला जात होता. त्याचवेळी सातारा जिल्हय़ात असहकाराची सुरुवात झाली. इंग्रजांचे आदेश धुडकावताना आपले स्वतंत्र आदेश असावेत अशी संकल्पना आली. यातच क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पर्वाला सुरुवात झाली. इंग्रजी सरकार धुडकावताना त्याला पर्याय उभा करत हिंदूस्थानातील केवळ सातारा जिल्हय़ात प्रतिसरकारची स्थापना करण्यात आली. इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांच्याच राज्यात सळो की पळो करताना अनेक अधिकाऱ्यांवर हल्ले झाले. जनतेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याला बांधुन त्याच्या पायाला पत्र्या ठोकल्या जात. त्यामुळे याच प्रतिसरकारला पत्रीसरकार म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. केवळ आदेश धुडकावणेच नाही तर स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी तरुणांची एक फळी उभी राहिली, त्यालाच ‘तुफान सेना’ म्हटलं जाऊ लागलं.
स्वातंत्र्यप्राप्तीचा इरादा आता तरुणांच्या डोक्यात शिरला होता. त्यांची देहबोलीसुद्धा धिप्पाड क्रांतीसिंहासारखी झाली होती. गावोगावी तुफान सेनेच्या तुकडय़ा उभ्या राहयल्या. आणि त्यांनी सरकारी कार्यालये फोडणं, पोष्ट, रेल्वे लुटणं, इतकच काय इंग्रजांची शस्त्रागारं लुटण्याच्या मोहिमा फत्ते केल्या.
देशभरात इंग्रजांचे अन्याय कहर करत होते. त्यावेळी साताऱ्यात मात्र प्रतिसरकारची दहशत निर्माण झाली होती. यातून सातारा व सांगली अशा एकसंघ जिल्हय़ात तुफान सेनेच्या तुकडय़ा तयार झाल्या.
टाळीवर लग्नं
देशात अनेक ठिकाणी छोटे मोठे उठाव होत असले तरी त्यांना इंग्रजांच्या दहशतीमुळे मान्यता मिळत नव्हती. मराठमोळय़ा सातारा जिल्हय़ात प्रतिसरकारला हळुहळु मान्यता मिळू लागली. क्रांतीसिंहांचा आदेश हा अंतिम असे मानुन व्यवहार सुरू झाले. हुंडय़ाला विरोध करताना प्रतिसरकारने ‘टाळीवर लग्नं’ सुरू केली. दोन्ही कुंटुंबप्रमुखांनी प्रतिसरकारसमोर टाळी दिली की लग्न नक्की. इथपर्यंत तुफान सेनेचा प्रभाव वाढला.
बापू कचरेंची दहशत अन् लंगडा पाटील
मवाळ आणि जहाल अशा गटामध्ये इतिहास सांगितला गेला असला तरी इंग्रजांविरोधात जे जे करणे शक्य होते ते ते नेत्यांकडून केले जात होते. सातारा जिल्हय़ावर प्रतिसरकारचा मोठा प्रभाव होता. याचवेळी खटाव तालुक्यात स्वातंत्र्यसेनानी बापू कचरे यांचा पगडा निर्माण झाला. बापू कचरेंसोबत संभाजीराव इंगळे, नामदेव बोराटे, किसन खेमाजी गोरे यांनी इथली आघाडी सांभाळली. इंग्रज सरकारकडे चाकरी करणारे काही जण प्रतिसरकार मानायला तयार नव्हते. निढळचा पोलीस पाटील त्यातलाच एक. तो प्रतिसरकार मानेना उलट प्रतिसरकारला मदत करणाऱयांची माहिती इंग्रजांना देत होता. पाटलांच्या चुगल्यांनी संतापलेल्या बापू कचरेंनी निढळच्या पाटलाला भरगावातून उचलले आणि शिवारात नेऊन त्याचा पाय तोडला. या प्रकाराने देशभक्तांची दहशत वाढली आणि लंगडा पाटील साऱ्या इलाक्यात प्रसिद्धी पावला.
चाकराच्या घरी क्रांतीचा पाळणासामान्य जनता अन्यायाने ग्रस्त होती. लोक प्रतिसरकारला सहकार्य करत होते. परंतु इंग्रजांच्या दरबारी चाकरी करणाऱ्या कुटुंबांना प्रतिसरकार किंवा उठाव मान्य नव्हता. बुध गावात बंडू सापतेंना इंग्रजांच्या दरबारी पोष्ट खात्याची चाकरी मिळाली होती. चाकरीत मश्गुल राहिलेल्या बंडू सापतेंना आपल्या घरी क्रांतीचा पाळणा हलतोय हे लक्षात आलं नसेल. अण्णाला शाळेत घातल्यापासून त्यानं उपद्व्याप करायला सुरुवात केली. चौथीला असतानाच लिहायला, वाचायला येतयं म्हणून गावच्या पाटीलकीत जन्म- मृत्यूच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी अण्णावर आली होती. एकीकडे इंग्रजांसाठी जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवणारा अण्णा राष्ट्रसेवा दलाची पत्रं वाचू लागला. यातून त्याला स्वातंत्र्याचा ध्यास लागला.
खटावात प्रतिसरकार सुरू झाले होते याचवेळी तरुणांबरोबर लहान लहान मुलं स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने पेटून उठली होती. अण्णा सापते याच पिढीतले. अवघ्या 12 वर्षाचा अण्णा आता कराडच्या गौरीहर सिंहासने आणि बापू कचरे यांच्या संपर्कात आला. सकाळी नोंदी ठेवायचे काम करायचा आणि दिवे विझवायच्या वेळेला पंचक्रोशीत सेवादलाची पत्रकं वाटायची. वडील सायबाकडे नोकरी करत असला तरी अण्णाच्या डोक्यात क्रांतीचा विचार येऊ लागला.
दोन्ही पाटीलक्या घरातच
इंग्रजांच्या काळात गावगाडा चालवण्याचे काम दोन पाटलांवर असत. सत्तेची प्रचंड दहशत असल्यामुळे अवघा एक पोलीस पाटील साऱ्या गावाला भारी पडत असे. पोलीस पाटील आणि मुलकी पाटील म्हणजेच पोलीस व महसूल खात्याचे हे दोन प्रमुख असत. 12 वर्षाच्या अण्णाच्या डोक्यात क्रांतीचे विचार येत होते त्यावेळी ही दोन्ही खाती त्यांच्याच घरात होती. मामा मुलकी पाटील तर भाऊ पोलीस पाटील. एकाच घरात दोन सरकारी नोकऱ्या असूनही अण्णाला त्या नोकऱ्या आणि इंग्रज सरकार दोन्ही मान्य नव्हतं.
चौदाव्या वर्षी पेटवली क्रांतीची मशाल
खंडाळा तालुक्यातल्या लोणंदच्या बाजारपेठेतला तानाजी चौक…. अरुंद जिन्यावरुन चालत वर गेलं की उजव्या बाजूला एक 7ƒ10 फुटाची खोली लागते. याच खोलीतल्या लाकडी खाटेवर बसलेल्या सातारा जिल्हय़ातील शेवटच्या स्वातंत्र्यसैनिकाचे दर्शन होते. जुनी पेटी, महात्मा गांधींची काही पुस्तकं, पेटी चरखा आणि पांघरुणं हेच 98 वर्षाच्या स्वातंत्र्यसैनिक अण्णा बंडु कचरे यांचं वैभव. अण्णांविषयी बऱ्यापैकी सगळी माहिती वाचून झाली होती तरी तेच किस्से त्यांच्या तोंडून ऐकताना सारं अंग शहारुन जात होतं. आजही त्यांच्या आवाजात ती जरब, तो अभिमान ठासुन भरलाय.
स्वातंत्र्यदेवतेच्या दूधावर पोसलेला अण्णा सापतेंचा देह भलं कृष झाला असेल पण थकलेला नाही. अजून औषधांची गोळी न घेणाऱया अण्णांना या वयातसुद्धा चष्मा नाही. चष्म्याशिवाय सुई-दोरा घालणाऱ्या अण्णांचा वयाच्या चौदाव्या वर्षीचा पराक्रम ऐकताना हाताच्या मुठी वळतात. डोळय़ात रक्त उतरतं आणि कानशिलं लाल होतात. तो प्रसंग असा आहे की, सेवादलाचं पत्रकं वाटणारं पोर आता सहावीत आलं होतं. पंचक्रोशीतल्या इंग्रजी सत्तेवर बापू कचरेंची दहशत व्हायला लागली होती. यावेळी इंग्रजांचा राजा पंचम जॉर्ज हाच भारताचा कर्ता करविता आहे, असे इंग्रजांकडून सांगितले जात होते. सहावीतल्या अण्णा सापतेंना इंग्रजांविरोधात बंड करायचे होते पण इंग्रजी चाकरांचा विरोध करण्यापेक्षा मुळावरच घाव घालू या विचारातून अण्णा सापतेंनी गावच्या चावडीवर लावलेला पंचम जॉर्जचा फोटो काढून साऱया गावासमोर फोडला आणि जाळून टाकला. साऱ्या गावकऱ्यांच्या समोर थेट पंचम जॉर्जचा फोटो जाळणाऱ्या अण्णा सापतेंची सरफरोशी सर्वत्र झाली. फोटो जाळून गावाबाहेर पळून गेलेल्या अण्णा सापतेंना दुसऱ्या दिवशी इंग्रज अधिकाऱयांनी पकडलं. इंग्रज अधिकाऱ्यांना वय कमी असल्यामुळे अण्णा सापतेंना कोणती शिक्षा देता आली नाही.
फौजदाराची अंगठी मानेत रुतली
कायद्यानुसार अण्णाला अटक करता येत नव्हती किंवा त्याला वय लहान असल्यामुळे शिक्षाही करता येत नव्हते. अण्णाला पकडणाऱ्या फौजदाराचा संताप झाला होता, त्या संतापात फौजदाराने चिमुकल्या अण्णाला जवळ ओढले आणि जी जोरदार थप्पड दिली ती अण्णाच्या मानेवर लागली. त्यात फौजदाराची अंगठी अण्णाच्या मानेत रुतली. फौजदार एका थपडीवर गप्प होणार नाही व आणखी मारणार म्हणून पहिल्या फटक्यानंतरच जखमी अण्णाने भर पोलिस ठाण्यातून धूम ठोकली व कोणाच्या हाती लागलाच नाही. मानेत रुतलेली अंगठी अण्णाने स्वतःच हाताने ओढून काढली.
9 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर
देशभरात महात्मा गांधींचा प्रचंड प्रभाव असताना त्यांनी गवालिया टँक, मुंबई येथील भाषणात ‘चले जाव’चा नारा दिला. करो या मरो अशा घोषणांनी देश दणाणून जात होता. 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींच्या चलेजाव या घोषणेमुळेच हा दिवस ‘ऑगस्ट क्रांती दिन’ म्हणून ओळखला जातो. चले जाव चळवळीने सारा देश पेटून उठला. सर्वत्र छोटे मोठे उठाव सुरू झाले. त्यावेळी प्रतिसरकारची भूमी असलेल्या सातारा जिल्हय़ात क्रांतीला आणखी बळ मिळालं. 9 ऑगस्टपासून बरोबर एक महिन्यात म्हणजे 9 सप्टेंबरला खटाव तालुक्याच्या कचेरीवर मोर्चा काढण्याचा जगातला सर्वात मोठा निर्णय झाला. मोर्चाची आखणी आणि बांधणी स्वातंत्र्यसैनिकांनी सुरू केली. देशभरात निघणाऱ्या असल्या मोर्चांना मूठभर लोक असतं आणि त्या मूठभर लोकांना इंग्रज अधिकारी दिसला की ते धूम ठोकून पळून जात. त्यावरुन खटावच्या मोर्चाचे महत्व लक्षात येतं.
बंदूकीला सामोरे जाणारे जिगर
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांची चित्रं डोळय़ापुढे दिसली तरी ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजूये कातिल में है’, या ओळी मेंदूच्या नसानसात घुमायला लागतात. 75 वर्षानंतर जर आजच्या तरुणांची ही गत ओत असेल तर प्रत्यक्ष इंग्रजांच्या जुलमाखालच्या पिढीची काय अवस्था असेल? हे केवळ वाचूनच समजणार आहे. कारण अण्णा सापतेंच्या पश्चात हे प्रत्यक्ष सांगणारं कोणी शिल्लक असणार नाही. संपली…. स्वातंत्र्य मिळवून देणारी ती पिढी संपली, ही हळहळ बाकी होण्याआधीच ‘तरुण भारत’ने अण्णा सापतेंची सविस्तर मुलाखत घेतली. या मुलाखतीचं शिखर तेंव्हा गाठलं गेलं की जेंव्हा अण्णा सापतेंनी खटावच्या कचेरीवरचा मोर्चा सांगायला सुरुवात केली. प्रत्येक प्रसंग अगदी मोर्चात आजूबाजूला कोण होतं. या मोर्चातला प्रत्येक क्षण आजही त्यांना मुखोद्गत आहे. अण्णांचा सोळाव्या वर्षीचा जुनुन 98 व्या वर्षी कायम होता. बापू कचरे आणि गौरीहर सिंहासने यांची नावे घेतानासुद्धा अण्णांच्या पापण्या जणु त्यांच्या अभिवादनासाठी झुकत असल्याचे जाणवत होते. एकीकडे प्रतिसरकारची वाढत असलेली दहशत, दुसरीकडे चलेजावमुळे पेटून उठलेले लोक, अशावेळी कचेरीवर मोर्चाचे नियोजन गोपनिय पद्धतीने सुरू होते. जमवाजमव ही तर फक्त लोकांची करायची होती. सरकारी अधिकाऱ्यांनाही मोर्चाची भनक लागली असावी. पण मोर्चात 5-25 पेक्षा जास्त लोक असणार नाहीत, अशी त्यांना खात्री होती. मोर्चाचे नेतृत्व आपोआपच बापू कचरेंकडे आले. त्यांच्या खांद्याला खांदा लावून गौरीहर सिंहासने, परशुराम घार्गे उभे ठाकले. या तिघांमुळे तरुणांना हत्तीचं बळ आलं. 9 सप्टेंबर 1942 ची ती पहाट उजाडली. तरुणांनी एकमेकांना हाक्या दिला, लोक जमू लागले. सकाळीच मोर्चाचा आकडा 100 पुढे जाणार असं वाटू लागलं होतं. प्रत्यक्ष मोर्चा तर 500 हून अधिक लोकांचा निघाला. मामलेदार अंकली यांना मोर्चाचा अंदाज आला तसे ते हडबडुन गेले. इंग्रज अधिकाऱयांसह त्यांच्या अधिकाऱयांवर झालेले हल्ले अंकलीच्या डोळय़ापुढून गेले. मामलेदार अंकली भेदरले असले तरी त्यांच्या दिमतीला बंदूकधारी पोलिसांची फौज होती. बंडगिरी नावाचा तगडा फौजदार होता. मोर्चा पावलोपावली उग्र होत चालला होता. सहभागी तरुणांच्या डोळय़ातल्या ज्वाला आता दिसू लागल्या. यापूर्वी जमाव पांगवण्यासाठी झालेला गोळीबार हा हवेत किंवा आंदोलनकर्त्यांच्या पायावरचा असायचा. यावेळी मात्र आक्रित घडलं. मोर्चेकऱ्यांच्या आवेशाने हडकंप माजलेल्या मामलेदार अंकलींनी गोळीबाराचा आदेश दिला. आणि फौजदार बंडगिरींनी थेट छातीवर गोळीबार सुरू केला. सारेच अनपेक्षित होते. मोर्चा रोखण्यासाठी इंग्रज पोलिसांची फौज पुढे उभी राहिली. सज्जतेचा आदेश झाला. पोलिसांनी बंदूकी उचलून थेट मोर्चेकऱ्यांवर रोखल्या तरी देशपेमींचे एकही पाऊल मागे सरलं नाही. छाताडावर रोखलेल्या बंदूका त्यांची हौसले डळमळीत करू शकले नाहीत. स्वातंत्र्याच्या इराद्याने निघालेल्या मोर्चावर बेधुंद गोळीबार झाला. क्षणार्धात देशभक्तांनी रक्ताचा सडा शिंपडला. अनेकजण जागेवर कोसळले, काही जण जखमी झाले, काही जणांची धरपकड झाली तर अनेकांनी भूमिगत होण्यासाठी धूम ठोकली. याच गोळीबारात फौजदार बंडगिरीची एक गोळी अण्णा सापतेंच्या डाव्या पोटरीत शिरली. उडालेल्या धावपळीत अण्णा सापते गोपूजच्या दिशेने पळाले. मागून गोळीबार सुरूच होता. त्याला चकवा देत अण्णा एका निवाऱ्याला पोहोचले.
क्रांतीकारकांना होतं औंध संस्थांनच अभय
खटावच्या गोळीबारानं नऊ क्रांतीकारकांना हौतात्म्य आल्याचं दुसऱ्या दिवशी कळलं. उजव्या पायाने डावा पाय फरफटत नेणारे अण्णा सापते गोपुजला पोहोचले खरे. पोलिसांचा ससेमिरा सुरूच होता. अशात त्यांनी औंध गाठलं. औंधचे राजे म्हणजे संस्थानिक बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांना क्रांतीकारकांविषयी विशेष आस्था होती. याशिवाय या संस्थानामध्ये कोणालाही अटक करायची नाही असा इंग्रजांबरोबर त्यांचा करार झाला होता. त्यामुळे अण्णा सापतेंसह काही जखमींना औंध गाठलं. बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनीही आस्थेवाईकपण याची चौकशी केली. नामी वैद्याला बोलवून सगळय़ांवर उपचार केले. हे सगळे जखमी पुढे पाच दिवस औंधातच राहत होते. काही दिवसांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी गोळीबाराचा निषेध करण्यासाठी खटाव गाठलं. जखमींची विचारपूस केली, हुतात्म्यांच्या कुटुंबांना भेट दिली.
थेट महात्मा गांधींचा सहवास
जहाल-मवाळ हे गट आत्ताचे, तेंव्हा हा भेद गावोगावी पोहोचला नव्हता. बुधचे क्रांतीकारी अण्णा सापते हे महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित. अण्णांना चार भाऊ आणि दोन बहिणी. अशा सात लेकरांपैकी हे लेकरु देशाला कुर्बान केल्यासारखं होतं. अण्णा सापतेंच्या सरकार विरोधातील अनेक मोहिमा यशस्वी होत असताना सातारा जिल्हय़ातील प्रतिगांधी म्हणजे सिद्धेश्वर कुरोलीचे माणिकचंद दोशी. माणिकभाईंचा पेहराव, रंगरुप अगदी महात्मा गांधीसारखं होतं, असं अण्णा आवर्जुन सांगतात. याच माणिकचंद दोशींनी अण्णांना वर्ध्याच्या गांधी आश्रमात नेहले. 1944 सालातील ऑक्टोबर ते डिसेंबर व 1945 सालातील मार्चपर्यंत असे सहा महिने अण्णा सापतेंचा वर्ध्यात महात्मा गांधींबरोबर सहवास राहिला. तेथे जाऊन अण्णा कापूस पिंजणे, पेळू वळणे आणि सूत कातण्याची कामे शिकलं. यावेळी 80 नंबरचे सूत तयार करणं त्यातल्या त्यात अवघड काम असलं तरी अण्णांनी ते करुन दाखवल्यामुळे महात्मा गांधींनी त्यांना पाठीवर हात ठेऊन शाबासकी दिलेली. महात्मा गांधींची ती शाबासकी आणि आयुष्यातील त्या सहा महिन्यांनी आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचं अण्णा आवर्जुन सांगतात.
शंभूराज देसाईंकडून विचारपूस
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर साजरा होत असताना स्वातंत्र्य सैनिकांचा फारसा विचार होताना दिसत नाही. अण्णा सापते हे उठावातील शेवटचे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे समजताच माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांची दूरध्वनीवरुन विचारपूस केली. नव्या सरकारात त्यांची योग्यप्रकारे दखल घेतली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.