स्थानकावर उतरताच प्रवाशांची होते अडचण
जगात प्रत्येक गोष्टीला एक ओळख प्राप्त असते. ही ओळख त्याच्या नावाने केली जाते. माणूस असो किंवा एखादी वस्तू तिला नाव असते आणि याच नावाने तिला ओळखले जाते. जर कुणी एखाद्या ठिकाणी गेला तर त्याबद्दल त्याच्या नावानेच सांगण्यात येते. भारतात प्रत्येक छोटय़ा जागेचे स्वतःचे असे एक नाव आहे.
भारतात तुम्ही कुठल्याही रेल्वेस्थानकावर गेला तर त्याचे एक नाव असते. परंतु एक असे रेल्वेस्थानक आहे ज्याला कुठलेच नाव नाही. पश्चिम बंगालमधील एका रेल्वेस्थानकाला नावच नाही. रेल्वेजाळय़ाप्रकरणी जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतात हा अजब प्रकार दिसून येतो.
पश्चिम बंगालच्या वर्धमानमध्ये एक रेल्वेस्थानक निनावी आहे. शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर रैना नावाच्या गावात हे रेल्वेस्थानक तयार करण्यात आले होते. 2008 मध्ये याची निर्मिती करण्यात आली होती, तेव्हापासून याला आतापर्यंत कुठलेच नाव मिळालेले नाही. 2008 पूर्वी रैनानगर नावाने या स्थानकाला ओळखले जात होते.
हे स्थानक आता नावहीन ठरले आहे. दोन गावांमधील मतभेदामुळे ही स्थिती ओढवली आहे. रैना आणि रैनानगर या गावांदरम्यान दीर्घकाळापासून वाद आहे. हे स्थानक रैना गावाच्या हद्दीत होते, परंतु याचे नाव रैनानगर ठेवण्यात आले होते. याचवरून दोन्ही गावांमध्ये संघर्ष होऊ लागला. यामुळे रेल्वेस्थानकावरील नामफलकच हटविण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत या रेल्वेस्थानकाला कुठलेच नाव नाही. परंतु अद्याप या रेल्वेस्थानकावरील तिकीट रैनानगर या नावाने काढले जाते.