आदिवासी नेते हरंगखाल यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा
@ वृत्तसंस्था / अगरतळा
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सत्तारुढ भाजपला सातत्याने झटके बसत आहेत. पक्षाचे आणखी एक प्रमुख चेहरे अन् आमदार दीवाचंद्र हरंगखाल यांनी बुधवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अनुभवी आदिवासी नेते दीवाचंद्र यांनी त्रिपुराच्या उनाकोटी जिल्हय़ातील करंचरा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर विजय मिळविला होता.
माजी आमदार आशीष कुमार साहा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांसोबत दीवाचंद्र यांनी राजीनाम्याचे पत्र विधानसभा सचिव विष्णू पाडा कर्मकार यांना सोपविले आहे. विधानसभा अध्यक्ष रतन चक्रवर्ती हे सध्या राज्याबाहेर आहेत. विधानसभा अध्यक्ष परतल्यावरच दीवाचंद्र यांचा राजीनामा स्वीकारला जाणार आहे.
1988 पासून चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या दीवाचंद्र यांनी वैयक्तिक कारणांस्तव पक्ष तसेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. स्वतःच्या पुढील निर्णयाबद्दल लवकरच माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आदिवासी नेते अन् भाजपमधून बाहेर पडत काँग्रेसचे आमदार झालेले सुदीप रॉय बर्मन यांचे दीवाचंद्र हे निकटवर्तीय आहेत.
यापूर्वी भाजप आमदार बरबा मोहन त्रिपुरा, आशीष दास, सुदीप रॉय बर्मन आणि आशीष कुमार साहा यांच्यासह आयपीएफटीचे आमदार मेवार कुमार जमातिया, वृषकेतु देववर्मा अणि धनंजय त्रिपुरा यांनी सत्तारुढ पक्षांसोबत झालेल्या मतभेदांमुळे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दास हे मागील वर्षी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. तर रॉय बर्मन आणि साहा यांनी फेब्रुवारीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बरबा मोहन आणि आयपीएफटीचे तीन आमदार हे प्रोगेसिव्ह रिजनल अलायन्समध्ये दाखल झाले आहेत. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.