कॅन्टोन्मेंट परिसरातील पाणीपुरवठा दहा दिवसांपासून ठप्प : महिलांचा संताप अनावर
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसराला पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिले होते. मात्र दोन महिने झाले नाही तोच पुन्हा पाणीपुरवठय़ात कपात करण्यास प्रारंभ झाला आहे. मागील दहा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने कॅन्टोन्मेंट परिसरातील महिलांनी सोमवारी दुपारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
विद्युतबिलाची रक्कम भरली नसल्याने पथदिपांचा विद्युतपुरवठा हेस्कॉमने बंद केला होता. याबाबत बेंगळूर येथील अधिकाऱयांची भेट घेऊन विनंती केली होती. याची दखल घेऊन दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदिपांचा विद्युतपुरवठा सुरू करण्यात आला. पण लागलीच पाणी बिलाची रक्कम भरणा केली नसल्याचे कारण देत एलऍण्डटी कंपनीने कॅन्टोन्मेंटच्या पाणीपुरवठय़ात कपात केली आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून कॅन्टोन्मेंट परिसरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणे कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांकडे करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. ऐन दिवाळी सणात पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
यापूर्वीदेखील पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आल्याने महिलांनी कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढला हेता. बिलाची रक्कम भरण्यात येईल, असे कॅन्टोन्मेंटच्यावतीने सांगण्यात आल्यानंतर यापुढे पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिले होते. पण दोन महिने झाले नाही तोच एलऍण्डटी कंपनीने पुन्हा पाणीपुरवठय़ात कपात करून कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे महिलांनी सोमवारी दुपारी कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
नागरिक महत्त्वाचे की अधिकारी?
यावेळी महिलांनी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांना भेटण्याची विनंती केली असता, मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी भेटण्यास नकार दिला. बेंगळूरहून डीईओ आले असल्याने बैठकीत व्यग्र असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिक महत्त्वाचे की अधिकारी? असा मुद्दा उपस्थित करून महिलांनी संताप व्यक्त केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी भेटण्यास नकार दिल्याने कार्यालयीन अधीक्षक एम. वाय. ताळूकर यांच्याकडे निवेदनाची प्रत देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. एलऍण्डटी कंपनीकडून पाणी कपात केल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल. पण सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन ताळूकर यांनी दिले.