पुणे / प्रतिनिधी :
दक्षिण अंदमानचा समुद्र तसेच लगतच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असून, या क्षेत्राचे 8 डिसेंबरपर्यंत वादळात रुपांतर होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने सोमवारी दिला आहे. हे वादळ दक्षिण आंध्र किनारपट्टी ते उत्तर तामिळनाडू किनारपट्टीदरम्यान धडकणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, या वादळामुळे राज्यातील थंडीचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे आहेत.
दक्षिण अंदमानचा समुद्र तसेच लगतच्या भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र असून, या क्षेत्राचे येत्या 24 तासांत न्यून दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल. त्यानंतर पश्चिम उत्तरपश्चिमेच्या दिशेने प्रवास करत या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे वादळात रुपांतर होईल तसेच 8 डिसेंबरच्या सकाळी दक्षिण आंध्र किनारपट्टी ते उत्तर तामिळनाडू किनारपट्टीजवळ पोहोचेल. याच्या प्रभावामुळे अंदमान समुद्र ते बंगालच्या उपसागरात समुद खवळलेला राहणार आहे. याबराबरोच या भागात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
वादळाचे नाव ‘मॅन्दोस’
या वादळाचे नाव ‘मॅन्दोस’ असे असणार असून, हे नाव यूएई ने दिले आहे.
अधिक वाचा : आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला विरोध; हिंदू महासंघाची न्यायालयात धाव
राज्यातील किमान तापमानात वाढ
राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडीचा कडाका कमी झाला आहे. सोमवारी गोंदियात सर्वात कमी 14.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दरम्यान, पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये
कुलाबा 24.2, सांताक्रूझ 23, रत्नागिरी 23.5, पणजी 24, डहाणू 22.6, पुणे 18.5, जळगाव 19.8, कोल्हापूर 21.2, महाबळेश्वर 16.7, मालेगाव 21.6, नाशिक 17.8, सांगली 20.5, सातारा 21.4, सोलापूर 21.4, औरंगाबाद 17.5, परभणी 20.5, नांदेड 18.8, अकोला 18.5, अमरावती 16.7, बुलढाणा 18.8, ब्रह्मपुरी 15.5, चंद्रपूर 16.6, नागपूर 15.4, वाशिम 14.2, वर्धा 16, यवतमाळ 16.