पुणे / प्रतिनिधी :
अजितदादा पहाटेची शपथ घेऊन आले होते. त्यामुळे आता ते परत न यायला काय झाले? राजकारणात कुणीही कुठेही जाऊ शकतो, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी भाष्य केले.
पुण्यात कांदाप्रश्नी आंदोलन केल्यानंतर ते बोलत होते. खोत म्हणाले, राजकारणी दोन दगडावर पाय ठेवून असतात. महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे पोरखेळ तसेच चेष्टेचा विषय झाला आहे. पवार नाराज असल्याच्या बातम्या या त्या वातावरणनिर्मितीचाच एक भाग आहे. मुळात अजितदादा पहाटेची शपथ घेऊन आले होते. त्यामुळे ते परत येणार नाहीत, असे कसे म्हणता येईल? राजकारणात कोण कुठेही जाऊ शकतो. राजकारणातील सत्तेची खुर्ची म्हणजे संगीत खुर्ची आहे. आवाज आला, तर गडी नाचायला लागत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
चाहते आपुलकीच्या भावनेतून पुरस्काराच्या कार्यक्रमाला जात असतात. अशावेळी नियोजनात समन्वय राहत नाही. चाहते किती येणार, याचा अंदाज येत नसतो. त्यामुळे सरकार असो की संस्था त्यांना नियोजन करणे कठीण जाते. अनेक कार्यक्रमात पास लावून कार्यक्रम घेत असतो. पण खुल्या कार्यक्रमात ती सुविधा नसते. मला कोणावर टीका करायची नाही. हा राजकीय स्टंट होता, अशा वल्गना विरोधक करत आहेत. मग तुम्ही काय गोटय़ा खेळताय का? तुम्ही सुद्धा तिथे राजकारण करत आहात. तुम्ही काय गोमूत्र शिंपडून पवित्र होऊन मुंबईत बसलेले नाही. तुम्ही राज्याच्या प्रश्नावर किती जागरूक आहात? किती आवाज उठवला, असा सवालही त्यांनी केला.