पुणे / प्रतिनिधी :
सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्षप्रवेश दिला जातो. भाजपही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहेत. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दांत भाजपाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
खासदार गिरीश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपसह सर्वच पक्षांवर नाराज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, राजकारण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढे ध्येय आता कार्यकर्त्यांचे राहिले आहे. गोरगरिब लोकांची लहान-मोठी कामे करून त्यांच्या चेहऱयावर दिसणारे समाधान पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, आता प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी चढोओढ लागली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्ता नसेल, तर पक्ष कसा उभा राहिले. मात्र, आता कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. जेवणावळी घालावी लागतात. राजकारणाचा स्तर खालावला आहे. वैचारिक बांधिलकी कार्यकर्त्यांकडे नाही. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुनचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यात कार्यकर्त्यांना धन्यता वाटत आहे. ही बाब माझ्यासारख्याला पटत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांवर मी नाराज आहे.
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंकडे आता सतरंजी उचलायला कार्यकर्ता उरला नाही
सत्तेसाठी कुणालाही पक्षात घेतले जाते
कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने किमान दहा वर्षे पक्ष संघटनेत काम केल्याशिवाय त्याला कोणतेही पद देण्यात येऊ नये. ही कृती सर्वच पक्षांनी केली, तर राजकारणातील स्तर टिकून राहील. आत्ता निवडणूक जिंकण्यासाठी दारूडय़ालाही जवळ केले जाते. ही प्रवृत्ती माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. त्याबाबत कोणीतरी बोलायलाच हवे. भाजपलाही सत्ता हवी आहे. हा निवडून येऊ शकत नाही. दुसरा निवडून येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सत्तेची राजकीय गणिते जुळविली जात आहेत. पूर्वी निवडणुकीतील अनामत रक्कमही जप्त झाली तरी चालत होते. आता सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेतले जाते. त्यामुळे निकषही बदललेले आहेत. हा सर्व प्रकार व्यथित करणारा आहे, अशी खंतही बापट यांनी बोलून दाखविली.