गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक; संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाबरोबरच सहकारातील घडामोडी शिकण्याच्या संधी
गडहिंग्लज जगदीश पाटील
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्यात मावळत्या संचालक मंडळातील दहा संचालक रिंगणात होते. त्यातील चौघांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर सहा संचालकांना सभासदांनी पुन्हा संधी दिली. निवड झालेल्या नव्या संचालक मंडळात सोमनाथ पाटील (महागाव), ऍड. दिग्विजय कुराडे (ऐनापूर), काशिनाथ कांबळे (हरळी), शिवराज पाटील (गडहिंग्लज), अक्षयकुमार पाटील (मुत्नाळ) या नव्या तरुण चेहऱयांना संचालकपदी संधी मिळाली आहे.
गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत दुरंगी लढत झाली. पण आमदार हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वखाली छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीने मोठय़ा मताधिक्यानी 19 जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. सर्वच 19 जागा जिंकत विरोधी काळभैरव आघाडीचा पराभव केला. या निवडणुकीत सत्तेत आलेल्या शाहू आघाडीकडून मावळत्या संचालक मंडळातील प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, सतिश पाटील, विद्याधर गुरबे, प्रकाश पताडे, सदानंद हत्तरकी यांना पुन्हा रिंगणात उतरवले होते. हे सर्वजण निवडून आले होते. विरोधी आघाडीकडून रिंगणात आलेले माजी व्हा. चेअरमन संग्रामसिंह नलवडे, अमर चव्हाण, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. निवडून आलेल्या 19 संचालकात 13 नव्या चेहऱयांना संधी सभासदांनी दिली आहे. यात 5 तरुण प्रथमच कारखान्यावर पोहोचणार आहेत.
शाहू आघाडीकडून रिंगणात आलेल्या अप्पी उर्फ विनायक पाटील यांचे पुत्र यांनी पहिल्याच प्रयत्नात कारखान्यात दमदार एंट्री करत 237 पैकी 199 मते मिळविले आहेत. त्यांनी शिवाजी खोत यांचा पराभव केला आहे. या शिवाय इतर मागास गटात ऐनापूरचे माजी सरपंच ऍड. दिग्विजय कुराडे यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यांना 10 हजार 053 मते मिळाली. अनुसूचित जाती गटातून काशिनाथ कांबळे यांनी 10 हजार 484 मते घेत विजय मिळवला. गडहिंग्लज-हनिमनाळ गटात दिग्गजांचा पराभव करत शिवराज पाटील आणि अक्षयकुमार पाटील या तरुणांनी विजय मिळवला. त्यांना अनुक्रमे 9 हजार 519 आणि 9 हजार 440 इतकी मते मिळाली. सर्वात तरुण म्हणून या पाच संचालकांची कारखान्याच्या राजकारणात प्रथमच एंट्री होताना दिसत आहे. या शिवाय महिला गटातील कविता पाटील (अत्याळ), मंगल आरबोळे (तनवडी) यांनीही विरोधी उमेदवारांचा पराभव करत कारखान्यात प्रवेश मिळविला आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात काम करताना या तरुणांना राजकारणाबरोबर सहकारातील घडामोडी शिकण्याची संधी मिळणार आहे. त्याचा त्यांना किती लाभ मिळणार ? हे काही काळाने समजून येणार आहे.