60/40 चा फॉर्म्युला आधी सरकारी कार्यालयांना लागू करा : उचगाव येथील ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
वार्ताहर / उचगाव
संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिक गुण्यागोविंदाने नांदत असताना या ठिकाणी कर्नाटक शासन मात्र जाणूनबुजून मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करून अन्याय करत असेल तर मराठी जनता कदापिही गप्प बसणार नाही. शासनाला उचगावच्या प्रवेशद्वारातील फलकावर 60/40 या प्रमाणात अक्षरे पाहिजे असतील तर सरकारी कार्यालयांवरील जेवढे फलक आहेत तेसुद्धा याप्रमाणेच करावेत. कोणतीही निवडणूक आली की त्याविषयीची निवडणूक परिपत्रके मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषांमध्ये देण्याचे कारस्थान कर्नाटक शासन करीत असते. मात्र इतर वेळी दुजाभावाची वागणूक देते. त्यामुळे जर मराठी भाषिकांना जाणूनबुजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा खणखणीत इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देसाई यांनी दिला.
उचगाव मध्यवर्ती गणेश मंदिरात गुरुवार दि. 21 रोजी स्वागत कमानीसंदर्भात बोलाविण्यात आलेल्या नागरिकांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष जावेद जमादार होते. यावेळी जि. पं. अधिकारी बसवराज आणि ता. पं. सीईओ राजेश धनवाडकर, काकती पोलीस स्टेशनचे सीपीआय गुरुनाथ, ग्राम पंचायतचे पीडीओ वासुदत्त हे उपस्थित होते.
कन्नड संघटनांना पोटशूळ
यावेळी बोलताना ता. पं. माजी अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांपासून या ठिकाणी हा फलक उभारलेला आहे. मात्र आता अलीकडे चार महिन्यांमध्ये कन्नड संघटनांना याचे पोटशूळ उठल्याचे दिसून येत असून जाणूनबुजून ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर’ फलकानंतर आता उचगावच्या कमानीकडे त्यांनी वक्रदृष्टी केलेली आहे. मात्र हा संपूर्ण परिसर मराठी असून जर मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर मराठी जनता स्वस्थ बसणार नाही. मतासाठी येणाऱया राष्ट्रीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आता मूग गिळून गप्प का? मराठी माणसांकडे त्यांचे साफ दुर्लक्ष आहे. मात्र वेळ आल्यानंतर त्यांची जागा दाखविल्याशिवाय मराठी माणूस गप्प बसणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे ठासून सांगितले. यावेळी एल. वाय. लाळगे, अरुण जाधव, दीपक गडकरी, शरद होनगेकर आदींनी आपले विचार मांडले.
नागरिकांची मते जाणून प्रस्ताव
यावेळी ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर यांनी सर्व नागरिकांची मते जाणून घेऊन त्यानंतर आपण प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांकडे मांडणार असून त्यानंतर त्यांचे विचार घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. यावर ग्राम पंचायत अध्यक्ष जावेद जमादार म्हणाले, ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही ग्राम पंचायत सदस्यही ठाम असून प्रशासनाने आमच्यावर दबाव आणू नये. आम्ही सर्वजण ग्रामस्थांसोबत आहोत. यासाठी शासनाने आमच्यावर दबाव आणू नये. जनतेसोबत आम्ही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्याय सहन करणार नाही
यावेळी भागोजी पाटील आपल्या भाषणात म्हणाले, कायदा हा सर्वांसाठी असून सर्व जनतेच्या संरक्षणासाठी आहे. मात्र कायद्याची तरतूद जर एकाच बाजूने करण्यात आली तर हा अन्याय असून आम्ही मराठी माणसे गप्प बसणार नाही, याचे शासनाने भान ठेवावे.
या बैठकीला उचगावमधील सर्व नागरिक, युवक मंडळांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.