अॅड. एन. आर. लातूर : त्रयस्थ व्यक्तीला पोलिंग एजंट म्हणून नेमायला हवे
प्रतिनिधी /बेळगाव
मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे तपासणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. मतदार यादीतील नावे गायब केल्याबद्दल निवडणूक आयोगाने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. म्हणजेच नावे गायब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मतदारांनी मतदार यादीतील नाव तपासणे आवश्यक आहे, असे मत ऍड. एन. आर. लातूर यांनी व्यक्त केले.
ऍड. लातूर 30 वर्षांपासून वकिली सेवेत आहेत. शिवाय कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, 2023 मध्ये निवडणुका जाहीर होतील. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदार यादीची पुनर्रचना करावी लागते. कारण ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे नाव वगळावे लागते. चुकीच्या नावाची दुरुस्ती करावी लागते. यासाठी बेळगावमध्ये मतदान यादी तपासण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी लवकरात लवकर या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.
व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीनमुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान व्हायला हवे. तसेच प्रत्येक बुथवर अनेक पोलिंग एजंट नेमण्याची गरज नाही. हे पोलिंग एजंट कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असणार नाहीत, म्हणजे त्रयस्थ व्यक्तीला पोलिंग एजंट म्हणून नेमायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
बहुसंख्य ठिकाणी अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांची नावे वगळली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही मतदाराचे नाव वगळले जाऊ नये यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या किंवा तज्ञ व्यक्तीच्या निरीक्षणाखालीच ही प्रक्रिया व्हायला हवी, अशी मागणी ऍड. लातूर यांनी केली आहे. तसेच निवडणुकीच्या दरम्यान काही अधिकाऱ्यांच्याच बदल्या होतात. तसे न करता सर्वच अधिकाऱ्यांच्या
आणि बी व डी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांच्याही बदल्या व्हायला हव्यात. जेणेकरून न्यायपूर्ण पद्धतीने मतदान होऊ शकेल, अशी सूचना ऍड. लातूर यांनी केली आहे.