कायदामंत्री रिजिजू यांनी केली घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी देशातील चार उच्च न्यायालयांसाठी मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा केली. न्यायमूर्ती सोनिया गिरीधर गोकाणी यांची गुजरातच्या मुख्य न्यायमूर्तीपदी वर्णी लावण्यात आली आहे. तसेच न्यायमूर्ती संदीप मेहता यांची गुवाहाटी, न्यायमूर्ती जसवंत सिंग यांची त्रिपुरा, न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांची जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयांमधील या नियुक्त्या करण्याअगोदर दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयातील रिक्त न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या होत्या. गेल्या आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात सात नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती करत केंद्र सरकारने सर्व 34 जणांचा कोटा पूर्ण केला होता. आठवडाभरापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसंबंधी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारला खडे बोल सुनावण्यात आले होते. त्यानंतर कायदा मंत्रालयाने तातडीने सर्व रिक्त जागा भरत न्यायव्यवस्था गतिमान करण्यासाठी पावले उचललेली दिसून येत आहेत.