केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते प्रदान
प्रतिनिधी/ पणजी
पुढील वर्षभरात देशातील विविध केंद्र सरकारी खात्यांमध्ये सुमारे 10 लाख उमेदवारांची भरती करण्याचे नियोजन असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सरकार यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
देशभरातील 75 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून शनिवारी पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांच्याहस्ते गोव्यातील 266 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास व्यासपीठावर त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री रोहन खवंटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा पोस्ट मास्टर जनरल सय्यद रशिद आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास 141 उमेदवार उपस्थित होते. 25 जणांना केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली. 266 पैकी 204 उमेदवारांची टपाल खात्यात तर उर्वरितांची अन्य विविध खात्यांमध्ये भरती करण्यात आली आहे.
त्यावेळी बोलताना श्रीपाद नाईक यांनी नियुक्तीपत्रे मिळालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारने व्यावसायिकता आणि रोजगार निर्मिती करण्यात दिलेल्या योगदानामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि देशावरच अनेक पटींनी सकारात्मक परिणाम होणार आहे, असे ते म्हणाले. सरकार कालबद्ध मर्यादेत 10 लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
श्री. रशिद यांनी तिकिट संग्रह आणि माय स्टँप्स या दोन विषयांवरील टपाल तिकीटे मान्यवरांना भेट दिली, तसेच नवीन नियुक्त झालेल्यांचे अभिनंदन केले.