विकासामुळे गर्लगुंजी गावचा चेहरा-मोहराच बदलणार
प्रतिनिधी/खानापूर
खानापूर भाजपच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सी. सी. पाटील यांची भेट घेऊन शहरासह तालुक्यातील विकासकामाबाबत निवेदन सादर केले. तसेच शहराच्या विकासासाठी काही योजना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यापैकी बसवेश्वर सर्कल ते पारिश्वाड क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या विकासकामाला मंजुरी देण्यात आली. तसेच गर्लगुंजी गावातील दीड कि. मी. रस्त्याचा विकास होणार असून या रस्त्यासाठी दुभाजक, दोन्ही बाजूला गटारी व प्रकाश व्यवस्था असे स्वरुप राहणार आहे. यामुळे तालुक्यातील सर्वाधिक जास्त लोकसंख्येचे गाव असलेल्या गर्लगुंजीचा आता चेहरा-मोहरा बदलणार आहे. या दोन्ही कामाना तात्काळ मंजुरी दिल्याबद्दल खानापूर भाजपच्यावतीने सी. सी. पाटील यांचे आभार मानण्यात येत आहेत.
बसवेश्वर सर्कल ते पारिश्वाड क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचा विकास होणार असून यामध्ये दुभाजक, दोन्ही बाजूने फुटपाथ, गटारी व प्रकाश योजना असे कामाचे स्वरुप असल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
तालुका भाजपच्या शिष्टमंडळात भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सुरेश देसाई, गुंडू तोपिनकट्टी, माजी ता. पं. सदस्य अशोक देसाई, बसवराज सानिकोप यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.