मंत्री उदय सामंत यांची माहिती ः नूतन मंत्रिमंडळाचा कोकणपट्टय़ासाठी महत्त्वपूण निर्णय
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मंत्रिमंडळात परवानगी देण्यात आली आहे. 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या या महाविद्यालयासाठी 522 कोटीच्या निधीला मंजूर देण्यात आली आहे. दिल्ली येथे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नूतन मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी सायंकाळी झुम ऍपद्वारे रत्नागिरीतील पत्रकारांशी आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधला. प्रथमदर्शनी जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारत आवारात हे शासकीय महाविद्यालय सुरु केले जाणार आहे. मनोरुग्णालयाची सुमारे 14 एकर जागा आहे. त्यातील 4 एकर जागेत नूतन इमारत व हॉस्टेलची उभारणी केली जाणार आहे. यासाठी आवश्यक 20 एकर जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीसाठी 25 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन इमारतीसाठी 114 कोटी 77 लाख, यंत्रसामुग्रीसाठी 120 कोटी अशा 259 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱयांच्या वेतनापोटी 3 वर्षासाठी 105 कोटी रुपये, 31 कोटी आवर्ती खर्च व अन्य मिळून एकूण 522 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत 3 वर्षात पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळात हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या रुग्णालयामुळे जिह्यातील डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लागेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचे आपले स्वप्न असून त्या दृष्टीने सुरु असलेले उपक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. जिल्ह्य़ात जोरदार पावसामुळे पूरस्थितीचा आढावा घेत येथील अधिकाऱयांना सूचना दिल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
मंत्री उदय सामंत 14 पासून रत्नागिरी दौऱयावर
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आपण 14 ऑगस्टपासून जिल्हा दौऱयावर येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी खेडचे आमदार योगेश कदम यांच्या मतदार संघात प्राधान्याने आढावा घेणार आहे. त्यानंतर चिपळूण येथे वाशिष्ठीची पाहणी व अधिकाऱयांशी चर्चा केली जाणार आहे. संगमेश्वर येथून थेट रत्नागिरीत येऊन मारुती मंदिर येथील शिवसृष्टीचे उद्घाटन सोहळा होणार आहे. याचवेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या उभारण्यात आलेल्या स्मृतीशिल्पाचा शुभारंभ होणार आहे.