व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ बैठकीचे आयोजन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जगातील कमी विकसित, गरीब देश आणि ग्लोबल साउथ एकत्र आणण्यासाठी भारताने व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ या नावाने एका व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीकरता 120 देशांना आमंत्रित करण्यात आले आहे. ग्लोबल साउथच्या प्रमुखांच्या शिखर बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी संबोधित केले आहे.
नव्या वर्षात आम्ही नवी ऊर्जा आणि नव्या अपेक्षांसोबत भेटत आहोत. मी 130 कोटीहून अधिक भारतीयांच्या वतीने ग्लोबल साउथच्या सर्व राष्ट्रप्रमुखांना नवेवर्ष भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा देतो. आम्ही एक अवघड वर्षाचे पान पालटले असून यात युद्ध, दहशतवाद आणि राजनयिक तणाव पाहिला आहे. तसेच अन्नधान्य, खत आणि इंधनाच्या दरांमध्ये वाढ अनुभवली आहे. जग एका संकटाच्या काळात असल्याचे स्पष्ट आहे. अस्थिरतेचा हा काळ कधीपर्यंत राहणार याचा अनुमान लावणे अवघड असल्याचे मोदींनी बैठकीला संबोधित करताना म्हटले आहे.
8 दशके जुन्या मॉडेलमध्ये होतोय बदल
ग्लोबल साउथच्या देशांची जागतिक भविष्यात सर्वात मोठी हिस्सेदारी आहे. आमचा बरोबरीचा आवाज असणे आवश्यक आहे. जागतिक व्यवस्थापनाच्या 8 दशके जुन्या मॉडेलमध्ये बदल होत असून यात आम्ही याला आकार देण्यात आमची भूमिका पार पाडण्याची आवश्यकता आहे. जगाच्या मोठय़ा समस्या उभ्या करण्यात ग्लोबल साउथची कुठलीच भूमिका नाही, परंतु या समस्यांचा सर्वाधिक प्रभाव आमच्यावरच पडतो. याचा प्रभाव आम्ही हवामान बदल, कोरोना महामारी, दहशतवाद आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात पाहिला आहे. या समस्यांवर तोडगा शोधण्यात आमची भूमिका आणि आमच्या आवाजाला कुठलेच स्थान दिले नसल्याचे मोदी म्हणाले.
भारताने नेहमीच आपल्या विकास अनुभवांना ग्लोबल साउथच्या सहकाऱयांसोबत शेअर केले आहे. आमच्या विकास भागीदारीच्या योजना वेगवेगळे देश आणि विविध क्षेत्रांमध्ये आहेत. आम्ही कोरोना महामारीच्या काळात 100 हून अधिक देशांना औषधांचा पुरवठा केला आहे. आमचे संयुक्त भविष्य निश्चित करण्यात विकसनशील देशांची भूमिका अधिक असावी यासाठी भारत सदैव प्रयत्नशील आहे. भारत जी-20 अध्यक्षत्वाची सुरुवात करत असताना ग्लोबल साउथचा आवाज मजबूत करणे स्वाभाविक असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर
आमच्या जी-20 अध्यक्षत्वासाठी ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर’ अशी थीम निवडली आहे. ही थीम आमच्या सांस्कृतिक मूल्यांच्या अनुरुप देखील आहे. विकासाच्या लाभांपासून आता ग्लोबल साउथला बाहेर ठेवले जाऊ शकत नाही. जागतिक राजनयिक आणि वित्तीय व्यवस्थापनाला आम्ही सर्वांनी मिळून नवा आकार देण्याची गरज आहे. यामुळे असमानता कमी करत नव्या संधी निर्माण करता येणार ओत. तसेच विकासाला चालना देत समृद्धी आणण्यास मदत होणार त्यांनी म्हटले आहे.
तुमचा आवाज भारताचा आवाज
विकसनशील देशांसमोर आव्हाने असले तरीही आमच्या भरभराटीचा वेळ येणार याबद्दल आशावादी आहे. समाजाला बदलू शकणाऱया सोप्या परंतु निरंतर स्वरुपात लागू करता येणाऱया उपाययोजना शोधल्या जाव्यात. गरीबी, आरोग्य सुरक्षा किंवा मानवी क्षमतांचा विकास अशाप्रकारच्या सर्व आव्हानांवर आम्ही तोडगा काढू शकतो. मागील शतकात आम्ही विदेशी राजवटीपासून मुक्त होण्यासाठी परस्परांना मदत केली आहे. पुन्हा एकदा या शतकात भागीदारी करत अशा व्यवस्थेची निर्मिती करू शकतो, जी आमच्या लोकांचे कल्याण निर्धारित करू शकते. ग्लोबल साउथचा आवाज हाच भारताचा आवाज आहे. तुमच्या प्राथमिकता भारताच्या प्राथमिकता असल्याचे मोदींनी सदस्य देशांना संबोधित करताना म्हटले आहे.