निवडणूक आयोगासमोर ठाकरे-शिंदे गटांकडून दावे-प्रतिदावे
महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय पक्षांना निर्णयाची उत्सुकता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यांच्यासंबंधी निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी, 20 जानेवारीला पुन्हा युक्तिवाद होणार आहे. मंगळवार, 17 जानेवारी रोजी बराचवेळ युक्तिवाद झाला असून शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. युक्तिवाद अंतिम टप्प्यात आला असल्याचे वाटत असतानाच ठाकरे गटाने अजूनही आपल्याला काही मुद्दे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने शुक्रवारी युक्तिवाद होणार आहे. हा युक्तिवाद संपल्यानंतर आयोग महत्त्वपूर्ण निवाडा देईल असे काही तज्ञांचे मत असले तरी त्याबाबत साशंकता आहे.
‘शिवसेना’ उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची? यावर केंद्रीय निवडणूक आयोगात मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मात्र, या सुनावणीमध्ये धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली पुढील सुनावणी आता शुक्रवार, 20 जानेवारीला होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि सुभाष देसाई हे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने वेगळा गट तयार करत भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून शिवसेना आपलीच असल्याचा दावा केल्याने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. 7 ऑक्टोबर 2022 रोजी †िशवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. या मुद्दय़ावर वेगवेगळय़ा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, चिन्ह आणि पक्षाचे नावासंबंधीचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर मांडण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने एक याचिका निकाली काढली होती. अन्य याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे सुनावणी केली जात आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्ष, चिन्हावरील कायदेशीर लढाई एकाचवेळी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. पण न्यायालयीन सुनावणी वारंवार लांबणीवर जात असताना आयोगातील कार्यवाही मात्र पद्धतशीर सुरु आहे.
ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा युक्तिवाद
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर केला. शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी असून शिंदे गटाच्या बाहेर जाण्यामुळे पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी आयोगाला सांगितले. शिंदे गटात समाविष्ट असलेले आमदार आणि खासदार पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना’ पक्षांतर्गतच निवडून आले आहेत. मतदारांनी त्यांना शिवसेना पक्षाच्या धोरणांना समोर ठेऊन मतदान केल्याचेही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केले आहे. शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचे सांगत शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये, असे आर्जवही त्यांनी केले आहे.
शिंदे गटाकडूनही जोरदार आक्षेप
निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्रुटी असल्याचा ठाकरे गटाचा युक्तिवाद जेठमलानी यांनी मंगळवारच्या सुनावणीत खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आयोगासमोरील सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून 23 लाख प्रतिज्ञापत्रे तर शिंदे गटाकडून चार लाख प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात आली आहेत. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत असा दावा केला होता. तसेच आपल्याकडून 23 लाख कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून त्यामधील कोणत्याही व्यक्तीला निवडणूक आयोगाने बोलवावे आणि त्याची ओळखपरेड, छाननी करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. तसेच शिंदे गटाच्या कागदपत्रांचीही छाननी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.
चालढकल करण्याचीही धडपड?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हासंबंधी निर्णय देण्यासाठी घाई करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत थांबावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. गेल्यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीमुळे तातडीने निर्णय दिला असला तरी आता कोणतीही आणीबाणीची परिस्थिती नसल्याचे ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत मुदतवाढ मिळवण्यासाठी ठाकरे गटाची धडपड सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीतील हालचालींवरून निवडणूक आयोग त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अंतिम निकाल देण्याच्या पवित्र्यात दिसत आहे.
दोन्ही गटांकडून वकिलांच्या फौजा
निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांकडून वकिलांच्या फौजा उभ्या करण्यात आल्या. ठाकरे गटाच्या वतीने ज्ये÷ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. तसेच ऍड. देवदत्त कामत, सनी जैन यांनीदेखील ठाकरे गटातर्फे युक्तिवाद केला. दुसरीकडे ऍड. महेश जेठमलानी, मनिंदर सिंह आणि निहार ठाकरे यांनी बाजू मांडली.