पाकिस्तानचा मित्रदेश अझरबैजानसोबत संघर्ष
वृत्तसंस्था / बाकू
तुर्किये आणि पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांच्या बळावर भीषण हल्ले करणाऱया अझरबैजानला सामोरे जाण्यासाठी आर्मेनियाने आता भारताच्या घातक शस्त्रास्त्रांची निवड केली आहे. आर्मेनियाने भारतासोबत क्षेपणास्त्रs, पिनाका रॉकेट आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी करार केला आहे. हा पूर्ण व्यवहार 2 हजार कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात आहे. आर्मेनियासोबतचा हा शस्त्रास्त्र व्यवहार भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत सरकारने सध्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
आर्मेनियाने दिलेल्या ऑर्डरमध्ये भारताचे स्वदेशी पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर देखील सामील आहे. पिनाकाची ही पहिली निर्यात ऑर्डर आहे. पिनाका रॉकेट सिस्टीम यापूर्वीच भारतीय सैन्यात सामील झाली आहे. या घातक रॉकेट सिस्टीमची निर्मिती डीआरडीओने केली आहे. भारतीय सैन्याने देखील अलिकडेच 6 पिनाका रॉकेट सिस्टीमसाठी ऑर्डर दिली आहे. याचबरोबर या रॉकेट सिस्टीमच्या अधिक पल्ल्यापर्यंत मारा करणाऱया आवृत्तीचेही परीक्षण केले जात आहे.
भारत आर्मेनियाला रणगाडविरोधी रॉकेट्स आणि दारूगोळाही पुरविणार आहे. 2020 मध्ये भारताने आर्मेनियाला 4 स्वाती रडार्स पुरविले होते. हा पूर्ण व्यवहार 350 कोटी रुपयांचा होता. या रडारला भारतीय सैन्याची गरज ओळखून डिझाइन करण्यात आले आहे. याच्या मदतीने शत्रूकडून डागले जाणारे तोफगोळे आणि रॉकेटच्या हल्ल्यांना ट्रक केले जाऊ शकते. याचबरोबर हा रडार शत्रूच्या या लाँचर्सच्या ठिकाणाची अचूक माहिती देतो. भारताने हा रडार पाकिस्तान आणि चीनच्या सीमेनजीक तैनात केला आहे.
भारत सातत्याने स्वतःची संरक्षण निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. 2025 पर्यंत 35 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. मागील वर्षापर्यंत संरक्षण निर्यात वार्षिक 13 हजार कोटींची होती. ही निर्यात प्रामुख्याने खासगी क्षेत्राकडून करण्यात आली होती.
आर्मेनियासमोर संकट
अझरबैजान तुर्कियेच्या बायरकतार ड्रोन आणि पाकिस्तानी शस्त्रास्त्रांच्या मदतीने आर्मेनियावर भीषण हल्ले करत आहे. काही दिवसांपूर्वी आर्मेनियाचे अनेक सैनिक अझरबैजानच्या हल्ल्यात मारले गेले होते. काराबाखच्या लढाईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भाग घेतला असल्याचेही वृत्त आहे. आर्मेनियाने रशिया तसेच अमेरिकेकडेही शस्त्रास्त्रांची मागणी केली आहे. परंतु आर्मेनिया आता भारताच्या शस्त्रास्त्रांच्या मदतीने अझरबैजानच्या सैन्याला प्रत्युत्तर देऊ शकणार आहे.