दीड वर्षांनी पाकिस्तानकडून आगळीक ः बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या दौऱयाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था / जम्मू
पाकिस्तानच्या सैन्याने मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांना लक्ष्य करत गोळीबार केला आहे. तसेच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली आहे.
जम्मू जिल्हय़ाच्या अरिना सेक्टरमध्ये झालेल्या या गोळीबाराला बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी सकाळी बीएसएफच्या गस्तपथकाला लक्ष्य करत गोळीबार केला होता. सतर्क बीएसएफ जवानांनी याला चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे बीएसएफचे उपमहानिरीक्षक पी.एस. संधू यांनी सांगितले आहे. गोळीबाराच्या घटनेत कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे बीएसएफच्या जनसंपर्क अधिकाऱयाकडून सांगण्यात आले. पाकिस्तान अशाप्रकारच्या गोळीबाराद्वारे दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणू पाहत असतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 25 फेब्रुवारी 2021 रोजी शस्त्रसंधी झाली होती. या शस्त्रसंधीनुसार नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेच्या भागात स्थानिक रहिवाशांनी पुन्हा शेती सुरू केली होती. मागील दीड वर्षात या शस्त्रसंधीचे पालन पाकिस्तानने केले होते. सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या दौऱयावर असल्याने पाकिस्तानने ही आगळीक केली असावी असेही मानले जात आहे.