ले.ज.-कर्नल ऑफ द रेजिमेंट अजय सिंग यांचे प्रतिपादन : उत्कृष्ट नियोजनासह पथसंचलनाबद्दल गौरवोद्गार : ‘सिनर्जी’ युद्धोत्तर पुनर्मिलन सोहळा
प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय सेना छत्रपती शिवरायांच्या पदचिन्हांवरून मार्गक्रमण करत आहे. साहस आणि राष्ट्रनि÷ा दाखवत सेनेने छत्रपतींचा इतिहासच अधोरेखित केला आहे. मराठा जवानांचा संयम आणि शौर्य, त्यांची कठोर तपस्या आणि मेहनत यामुळे भारतीय सेनेने देशाचे नाव उंचावले आहे. येत्या काळातही याच गौरवशाली इतिहासाचा वारसा जपत देशाच्या सुरक्षिततेसाठी सेना कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट अजय सिंग (एव्हीएसएम) यांनी केले.
ले. ज. अजय सिंग पुढे म्हणाले, ‘कर्तव्य, मान, साहस’ या त्रिसूत्रीवर भारतीय सेना देशाचे नाव उंचावत आहे. कठोर परिश्रम, कर्तव्याप्रती निष्ठा, साहस आणि राष्ट्राप्रती समर्पण हे भारतीय सेनेचे वैशिष्टय़ आहे. शत्रूला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. आमच्या मातृभूमीकडे वक्र नजर टाकेल, त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.
गौरवशाली परंपरा
अडीचशे वर्षांचा अभिमानास्पद इतिहास आणि गौरवशाली परंपरा असणाऱया मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट येथे ‘सिनर्जी’ युद्धोत्तर पुनर्मिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 15 ते 17 ऑक्टोबरदरम्यान हा सोहळा होत असून दि. 16 रोजी आयोजित मेळाव्यात ले. ज. अजय सिंग बोलत होते. मराठा लाईट इन्फंट्रीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल तसेच जवानांच्या शानदार पथसंचलनाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
या पुनर्मिलन सोहळय़ाला पूर्व सेनाध्यक्ष व अरुणाचलचे माजी राज्यपाल जनरल जे. जे. सिंग (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, निवृत्त), कमांडर इन चीफ अंदमान व निकोबारचे मेजर जनरल के. नारायणन (एव्हीएसएम), याशिवाय 10 लेफ्टनंट जनरल्स (कार्यरत आणि निवृत्त), 19 मेजर जनरल्स (कार्यरत आणि निवृत्त), डेप्युटी डायरेक्टर जनरल (एचआरडी), कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती तसेच नौदल, हवाई दल तसेच तटरक्षक दलाचे अधिकारी उपस्थित होते.
इन्फंट्रीच्या सिल्व्हर बँडने पथसंचलनाला साथ केली. तिन्ही दलांच्या जवानांनी ले. ज. अजय सिंग यांना शानदार पथसंचलनाद्वारे मानवंदना दिली. अजय सिंग तसेच मेजर जनरल के. नारायणन, माजी कर्नल ऑफ रेजिमेंट पी. जे. एस. पन्नू व शाहू छत्रपती महाराज, इन्फंट्रीचे निवृत्त कमांडंट ब्रिगेडियर रणजित मिश्रा, गोविंद कलवाड, तटरक्षक दलाचे उपमहानिर्देशक वीरेश तिवारी आणि अन्य अधिकारी यांच्या हस्ते युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱयांच्या हस्ते वीरपत्नी आणि वीरमातांना गौरविण्यात आले. इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी स्वागत केले.