आदेशाची वाट पहात आहोत ः उत्तर कमांडचे प्रमुख द्विवेदी यांचे वक्तव्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाकव्याप्त काश्मीर घेण्यास भारतीय सेना सज्ज आहे, असे महत्वपूर्ण विधान भारतीय भूसेनेच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ आहेत. तेथून भारतात दहशतवादी घुसविण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. सध्या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी आहे. ही योग्य बाब आहे. मात्र, पाकिस्तानकडून शस्त्रसंधी तोडली गेल्यास भारतीय सेना पाकव्याप्त काश्मीर घेतल्याशिवाय राहणार नाही. याची संबंधितांनी पूर्ण जाणीव ठेवावीं, असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला दिला.
पाकव्याप्त काश्मीरात दहशतवाद्यांचे अनेक तळ असून तेथे सध्या 160 दहशतवादी सज्ज आहेत. याशिवाय या भागात अन्यत्र 300 हून अधिक दहशतवादी सक्रीय आहेत. आवश्यकता भासल्यास देशाच्या सुरक्षेसाठी तेथे आम्ही कारवाई करु शकतो. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि तसा प्रस्ताव अनेक दशकांपूर्वीच भारताच्या संसदेने संमत केला आहे. त्यामुळे भारतीय सेना हा भाग भारताला जोडण्यासाठी सज्ज असून आम्हाला आदेश मिळाल्यास पुढील कार्यवाही भारतीय सेना करुन दाखवेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
370 हटविल्यानंतर परिवर्तन
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद 370 आता निष्प्रभ करण्यात आला आहे. तेव्हापासून काश्मीर खोऱयातील परिस्थितीत झपाटय़ाने परिवर्तन घडत आहे. प्रशासन पूर्णतः लोकांच्या हिताची कामे करीत आहे. खोऱयातील दहशतवाद संपण्याच्या मार्गावर असून तो त्याचे शेवटचे दिवस मोजत आहे. दहशतवाद खतम करण्यासाठी आता लोकांचेही उत्कट सहकार्य मिळत आहे. त्यामुळे भारतीय सेनेचे नैतिक बळ वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ड्रोनची चिंता नाही
पाकिस्तानकडून भारतात ड्रोन्स पाठविली जातात. त्यांच्यातून शस्त्रास्त्रे भारत भूमीवर उतरविली जातात. ती भारतविरोधी शक्तींच्या हाती पडतील अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न शेजारच्या देशाकडून करण्यात येतो. मात्र, आतापर्यंत शेजारील देश त्याचे हेतू साध्य करुन घेण्यात अपयशी ठरला आहे. पाकिस्तानी ड्रोन्स आम्ही पाडलेली असून आम्हाला त्यांची चिंता वाटत नाही. पाकिस्तानचे कोणतेही कारस्थान हाणून पाडण्याचे सामर्ध्य आमच्यात आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
लेह-लडाखसंबंधी बैठक
लेह आणि लडाख भागाच्या सुरक्षेसाठी भारतीय भूसेनेची महत्वाची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीला द्विवेदी उपस्थित होते. या भागावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न शेजारी देश करीत आहे. त्या देशातून भारतात अंमली पदार्थ पाठविले जातात. पाकिस्तानकडून भारतात शस्त्रांची तस्करीही केली जाते. या समस्यांसंदर्भात सेनाधिकाऱयांच्या बैठकीत उपायांवर विचार झाला असे त्यांनी स्पष्ट केले. ड्रोन्सविरोधी यंत्रणा बसविण्यात आली असून ती प्रभावीरित्या काम करीत आहे. चीनबरोबरही सेनेच्या पातळीवर चर्चा होत असून या चर्चेचे सकारात्मक परिणाम होतील, असा विश्वास द्विवेदी यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केला.
अग्नीवीर योजना हिताचीच
सेनेच्या तिन्ही दलांमध्ये युवकांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने अग्नीवीर योजना आणलेली आहे. ती देश आणि सेनादले यांच्या हिताचीच आहे. तसेच ती देशासाठी लढू इच्छिणाऱया युवकांच्याही हिताची आहे. अग्नीवीर योजनेतून येणाऱया युवकांना नंतरही मोठी संधी आहे. त्यांना भारतीय सेनेत पुढे सेवाही करता येईल. तर इतर युवकांना अर्थसेना दलांमध्ये घेण्यात येईल. त्यामुळे आपले नंतर काय होईल, याची चिंता युवकांनी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या हितरक्षणाची पुरेपूर दक्षता घेतली जाईल, असा विश्वास त्यांनी नवयुवकांना दिला.