जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
भाग्यनगर येथे किरकोळ कारणातून एका तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र इतर दोघांना अजूनही अटक करण्यात आली नाही. तेंव्हा तातडीने त्यांना अटक करावी, या मागणीसाठी जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांसह या परिसरातील नागरिकांनी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना निवेदन दिले आहे.
क्षुल्लक कारणातून भाग्यनगर येथे मंगळवारी रात्री आशिष बाबाजी शेणवी या युवकाला चौघांनी लाथाबुक्मक्यांनी मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अशा घटना वारंवार घडत आहेत. तेंव्हा पोलिसांनी अशा घटनांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षादेखील झाली पाहिजे. आता दोघांना अटक करण्यात आली असली तरी अजूनही दोघे जण मोकाट आहेत. आपला मुलगा हा दुबईमध्ये नोकरी करतो. सुटीसाठी तो आला असता ही घटना घडली आहे. त्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. मारहाण करणाऱया तरुणांना चांगला हिसका दाखविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तेंव्हा तातडीने इतरांनाही अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एन. बी. शेणवी, आर. के. पाटील, गीता दबवी, रुपा शेणवी, वरुंदा शेणवी, सागर शेणवी, सचिन शहापूरकर, भऊ चौगुले, सीमा पाटील, एस. एस. कुडेकर, एम. वाय. गुरव, व्ही. एन. गुरव, दिनेश आनंदाचे यांच्यासह मारहाणीत जखमी झालेल्या आशिष याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिक उपस्थित होते.