वृत्तसंस्था/ बारामूला
गुलाम नबी आझाद यांनी कलम 370 संबंधी मोठे वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्हय़ातील एका जाहीरसभेला संबोधित करताना कलम 370 मीच काय कुणीच परत मिळवू देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस, शरद पवार तसेच ममता बॅनर्जी यांनाही हे शक्य नाही. पुढील 10 दिवसांमध्ये नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे आझाद यांनी नमूद केले आहे.
73 वर्षीय आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेसला रामराम ठोकला होता. काँग्रेसमध्ये सुमारे 5 दशकांपर्यंत कार्यरत राहिलेले आझाद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यत्वासह जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रिपद तसेच केंद्रीय मंत्रिपद भूषविले होते.
मी कुणाकडूनच नियंत्रित नाही. माझा रिमोट कंट्रोल माझ्याकडेच आहे. काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे नेते कुणाच्या नियंत्रणात आहे हे मी उघड करू इच्छित नसल्याचे म्हणत आझाद यांनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने आझाद यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हातात असल्याची टीका केली होती.