दौरा संपताच धर्मवीर संभाजी चौकातील भगवी वस्त्रे-पताकाही हटविल्या
बेळगाव ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोसाठी संपूर्ण शहरात सुशोभिकरण करण्यात आले होते. धर्मवीर संभाजी चौकातील घड्याळाभोवतीही भगवेमय असे सुशोभिकरण करण्यात आले होते. तसेच येथील घड्याळाची दुरुस्तीही करण्यात आली होती. मात्र पंतप्रधान मोदी यांचा दौरा संपताच येथील सुशोभिकरण हटविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे घड्याळाच्या वेळेतदेखील फरक पडला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. धर्मवीर संभाजी चौकात अलीकडेच सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी परिसराची स्वच्छता करून सुशोभिकरण करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात भगवी वस्त्रे लावून येथील चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले होते. त्यामुळे हा परिसर खूपच सुंदर बनला होता. मात्र या चौकात बसविण्यात आलेले घड्याळ बंद पडले होते. त्यामुळे घड्याळाची दुरुस्तीही करण्यात आली. पण पंतप्रधानांचा दौरा संपल्यानंतर येथील भगवी वस्त्रे व पताका हटविण्यात आल्या आहेत. पंतप्रधान माघारी परतताच येथील घड्याळानेही काम करणे बंद केले आहे. या घड्याळाला चारही बाजूने वेळ दिसतो. पण यापैकी चारही बाजूचा वेळ वेगवेगळा दर्शवित आहे. एका बाजूला 3.30 तर दुसऱ्या बाजूला 5.30 तर तिसऱ्या बाजूला वेगळाच वेळ दिसून येत आहे. त्यामुळे दौरा संपल्याने घड्याळानेही आपला वेळ बदलला आहे का? असा मुद्द उपस्थित झाला आहे.
आश्वासनांची खैरात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध पक्षांच्यावतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची खैरात केली जात आहे. तसेच मतदारांसाठी विविध प्रकारची भेट दिली जात आहे. त्यामुळे काहीजण एका पक्षाकडून मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन पुन्हा दुसऱ्या पक्षाकडे भेट घेण्यासाठी वळत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी विविध खात्यांच्यावतीने व पोलीस प्रशासनातर्फे जय्यत तयारी केली होती. रोड शोच्या मार्गावरील अडचणी दूर करण्याच्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने मागील 15 दिवसांपासून तयारी चालविली होती. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर पोलीस प्रशासनासह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याचप्रमाणे घड्याळानेही काम थांबवून आपला वेळ बदलला आहे का? अशी चर्चा होत आहे.