गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम-मेघालय सीमेवर लाकूड तस्करी थांबवताना मंगळवारी हिंसाचार झाला. या हिंसाचारात वनरक्षकासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आसाम-मेघालय सीमेवर बेकायदेशीर लाकूड वाहून नेणारा ट्रक रोखल्यानंतर हिंसाचार झाला, असे अधिकाऱयांनी सांगितले. या हिंसाचाराचे लोण बुधवारी आजुबाजुच्या जिल्हय़ांमध्ये पसरल्यानंतर तणाव वाढला. खबरदारीचा उपाय म्हणून 7 जिह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
हिंसाचाराची मुख्य घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद अन्यत्रही उमटले. मंगळवारी मध्यरात्रीनंतर मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये आसामची एक एसयूव्ही अज्ञात लोकांनी पेटवून दिली. अग्निशमन दलाने आग विझवली असली तरी एसयूव्ही पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
जमाव शस्त्रे घेऊन रस्त्यावर
हिंसाचाराच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही स्थानिक लोक हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरले. तस्करांना सोडण्याची मागणी करत जमावाने वनरक्षक आणि पोलिसांना घेराव घातला. बचावासाठी जमावावर गोळीबार करावा लागला, असा दावा करण्यात येत आहे. या घटनेची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
वनरक्षकासह 6 जणांचा मृत्यू
हिंसाचारात वनरक्षकाचा मृत्यू झाला. त्याशिवाय मेघालयातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनरक्षकाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.