23 ऑक्टोबर रोजी करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे राज्यारोहण
सौरभ मुजुमदार/कोल्हापूर
5 एप्रिल 1866 रोजी सावर्डेकर भोसले घराण्यात एक कर्तृत्ववान सुपुत्र जन्मास आला. अफाट बौद्धिक क्षमता सोबत शारीरिक सुदृढता याचमुळे ब्रिटिश सरकारने याच सुपुत्राची करवीर संस्थानच्या छत्रपती पदी योग्य निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ब्रिटिश अधिकारी कॅप्टन वेस्ट याने आठ वर्षाच्या या बाळाचे सुरेख वर्णन करुन ठेवलेले आहे.
विजयादशमीच्या सुमुहूर्तावर नारायणराव दिनकरराव भोसले सावर्डेकर घराणे यांना 23 ऑक्टोबर 1871 रोजी करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज म्हणून नाभाभिधान मिळाले. करवीर संस्थानाला लाभलेल्या छत्रपतींपैकी अत्यंत महत्त्वपूर्ण कारकीर्द यांनी केली. एका छत्रपतींना शोभेल एवढय़ा मोठय़ा थाटामाटात हा समारंभ खासगी कारभारी महादेव वासुदेव बर्वे यांच्या पुढाकाराने कोल्हापूर राज्यातील सरदार, जहागीरदार, वतनदार, मानकरी, यांसह राज्यातील अनेक रावबहाद्दुर यांच्या उपस्थितीत पार पडला.
इ.स. 1873 ला मुंबई येथे व्हाईसरॉयच्या विशेष दरबारात इंग्रजी भाषेवर अफाट प्रभुत्व असलेल्या या छत्रपतींना आपल्या राज्याबद्दल बोलण्याची प्रचंड इच्छा होती. परंतु ही ब्रिटिश सरकारने नाकारली. नेमकी हीच गोष्ट चौथे शिवाजी महाराज छत्रपती यांच्या मनात ब्रिटिश सरकार विरुद्ध ठिणगी म्हणून पेटून उठली. मुंबईच्या दरबारामध्ये प्रिन्स ऑफ विल्स यांच्या हस्ते या छत्रपतींचा झालेला सत्कार हा केवळ त्यांच्या गुणात्मक, धाडसाच्या व शौर्याच्या जीवावरच झालेला हे संपूर्ण जगाने पाहिलेले होते.
जानेवारी इ.स.1877 ला याच छत्रपतींना ब्रिटिश साम्राज्याची महाराणी व्हिक्टोरियाने कैसर -ए- हिंद हा सर्वोच्च किताब धारण करण्यासाठी विशेष आमंत्रित केले होते. परंतु ब्रिटिश सरकारचा यापूर्वीचा ढोंगीपणा महाराजांना आवडला नाही. शिवाय राज्यात दुष्काळ सदृश स्थिती सोडून कार्यक्रमास जाणे त्यांना योग्य वाटले नसल्याने छत्रपती या समारंभास हजर राहू शकले नाहीत.
एप्रिल इ.स.1879 मध्ये राजकोटच्या प्रिन्स कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण करून छत्रपती चौथे शिवाजी महाराज करवीर संस्थानात परत आले ते सोबत एक क्रांतिकारक विचार घेऊनच. आपले संस्थान, सार्वभौमत्व, व छत्रपतीसारखे बहुमूल्य पद यामुळे ब्रिटिशांसमोर वाकणे यांना कदापी मान्य नव्हते.
याच कारणामुळे नंतर ब्रिटिश सरकारची सक्त कैद सुरू होऊन जणू त्यांच्या अंतिम पर्वालाच सुरुवात झाली. जनतेच्या मनातील प्रिय राजा यामुळे या छत्रपतींना संपुष्टात आणणे सहजासहजी शक्य नव्हते. हे ओळखून त्यांची मनस्थिती बरोबर नसून हवा पालटणीस त्यांना बाहेर नेणे गरजेचे असल्याचे सांगून ब्रिटिश सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना आखली. इ. स. 1869 रोजी अनेक वृत्तपत्रांनी याबाबत ब्रिटिश सरकार विरुद्ध आपल्या लेखनातून आवाज उठविला. पुणे येथून 19 जून 1882 ला करवीरच्या या लाडक्या, धाडसी, व अत्यंत हुशार अशा छत्रपतींना नगरच्या किल्ल्यामध्ये हालविले जेथे त्यांना कडेकोट बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आले. याच किल्ल्यामध्ये त्यांचा अमानुष छळ करण्यात आला, त्यांना मरणप्राय यातना दिल्या, ज्यामुळे त्यांची प्राणज्योती त्याच ठिकाणी मालवली.
हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे एकमेव स्मारक पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल
ज्या छत्रपतींनी ब्रिटिश साम्राज्या विरोधात आवाज उठविला. संस्थानच्या प्रजेसाठी धाडसी कृत्य केले त्यांना अतिशय दुःख यातना देऊन शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. अशा छत्रपतींच्या या बलिदानाचे एकमेव स्मृती स्मारक म्हणजेच हा शिवाजी पूल ( अशीच नोंद अजूनही या पुलावर आहे.) या पवित्र वास्तूचे आपणच सर्वांनी संरक्षण व संवर्धन केलेच पाहिजे.
अहमदनगर येथील ज्या किल्ल्यामध्ये चौथ्या शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांनी भेट देऊन अभिवादन केले व अहमदनगर येथे चौथ्या शिवाजी महाराजांची समाधी त्याचबरोबर चौथ्या शिवाजी महाराजांच्या नावे वस्तीगृहाची स्थापना केली. त्याचबरोबर कोल्हापूर येथील नर्सरी बाग या परिसरामध्ये आपले दत्तक पिताजी चौथे शिवाजी महाराज यांचे समाधी स्मारक राजर्षी शाहू महाराजांनी उभारले.– गणेशकुमार खोडके, अभिलेखाधिकारी, पुराभिलेखागार विभाग, कोल्हापूर