खिचडी, केळी, दूध वाटप : वारकऱ्यांच्या पोषाखात बालचमूंची दिंडी
प्रतिनिधी/कोल्हापूर
वारकरी व भाविकांचा विठूनामाचा गजर… विठठल-रूक्मीणीच्या दर्शनासाठी शहरातील मंदीरामध्ये उशीरापर्यंत लागलेल्या रांगा…मंदीर परिसरामध्ये पूजेच्या साहीत्याचे उभारलेले स्टॉल्स…विविध सेवाभावी मंडळाकडून खिचडी, केळी व दूध वाटपासह, बालचमूंच्या दिंडीमुळे, भुरभुरत्या पावसात शहरातील रविवारच्या आषाढी एकादशीचे वातावरण पूर्णपणे भक्तीमय झाल्याचे दिसत होते.
नंदवाळ आषाढीवारीमध्ये शिवाजी पेठेतील खंडोबा मंदिरासमोर उभे तर पुईखडी येथे गोल रिंगण सोहळ्याने, कोल्हापूरात अवघी पंढरी अवतरली असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. विविध संस्था, संघटना व तरुण मंडळासह ठिकठिकाणी खिचडी, केळी, दूध व फराळाचे वाटप करण्यात येत असल्याचे दिसून आले. शहरातील अनेक मंदीरामध्ये फळांचे ,फूलांचे आरास करण्यात आले होते. तर विठठल-रूक्मीणी मूर्तींना तुळशी पानाचे हार घालण्यात आले होते.
प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ येथील वारी मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरात सकाळी पोचली. विधिवत आरतीनंतर राम कृष्ण हरीच्या गजरात ही दिंडी .मान्यवरांच्या हस्ते आरती करून, नंदवाळकडे विठू माऊलीच्या गजरात भुरभुरत्या पावसात मार्गस्थ झाली.
हे ही वाचा : आषाढी दिंडीला वारकऱ्यांचा महापूर; भरपावसात कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडी
शिवाजी पेठेतील खंडोबा मंदिर तालीम परिसरात माऊली पालखीचे जेजुरी प्रमाणे बेल , भंडारा उधळत विठोबा – रुखमाई – खंडोबाच्या जय जयकारात व उत्साहात स्वागत करण्यात आले. . या मार्गावर खास पिवळया झेंडूच्या फुलाच्या रांगोळ्या व पायघडयानी या परिसरातील वातावरण पिवळे धमक करण्यात आले होते . या ठिकाणी रांगोळे बंधूच्या दोन माऊली अश्वानी तीन फेऱया उभे रिंगण केले. यावेळी भाविक व वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर केला.
मिरजकर तिकटी येथील विठठल-रूक्मीणीच्या दर्शनासाठी मंदीर परिसरामध्ये रात्री उशीरापर्यंत रांगा लागलेल्या दिसत होत्या. तर या परिस्रातच पूजा साहीत्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. तर मार्केट यार्ड येथील श्री विठठल -रूक्मीणी सार्वजिनक व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मंदीरामध्ये फूल , फळे व तुळशी हाराव्दारे आकर्षक पूजा साकारण्यात आली होती.
पुईखंडी येथे संकल्प सिद्धी मंगला कार्यालयात विसावा ठिकाणी मान्यवरानी पालखीचे पूजन करून फराळ वाटप करण्यात आले. . वाखरीमय अनुभव देणारा गोल रिंगणाचा अनुभव , पुईखंडी येथील खुल्या मैदानात विठ्ठल – रुखमाईच्या गजरात सर्वानी अनुभवला.. या ठिकाणी माऊली अश्व जोडीने पाच फेऱया पूर्ण केल्यावर भाविकानी नमोभावे वंदन केले . विठ्ठल – रुखमाई गजरात तल्लीन होऊनच भुरभुरत्या तर कधी मुसळधार पावसाच्या साक्षी ने ज्ञानेश्वर माऊलीच्या वातावरण पसायदानमय बनून गेले होते.
बालचमूंची दिंडी
आषाढी एकादशीमुळे बालचमुंच्यामध्येही मोठा उत्साह दिसत होता. शाळांना सुट्टी असून देखील अनेक शाळामध्ये दिंडी काढण्यात आली होती. पांढरी विजार,पांढरा शर्ट,डोक्यावर पांढरी टोपी,कपाळाला गंध,अबीर बुक्का, डोक्यावर तुळशी वृदांवन, हातात चिपळया, भगव्या पताका, टाळ,मृदंग व विणा अशा पेहरावतील चमूंची गर्दी शहरात विविध ठिकाणी दिसत होती.