अन्य 13 जणांचाही समावेश, न्यायालयाकडून आरोपनिश्चिती
@ लखीमपूर खीरी / वृत्तसंस्था
गेल्यावर्षी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीरीनजीक तिकुनिया येथे आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर गाडी घालून चार शेतकऱयांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा टेनी याच्यावर या प्रकरणी अभियोग चालणार आहे. त्याच्यासह अन्य 13 आरोपींवरही अभियोग सादर करण्यात आला असून न्यायालयाने आरोप निश्चिती केली आहे.
16 डिसेंबरला सरकारी पक्ष न्यायालयात पुरावे सादर करणार आहे. त्यानंतर सुनावणीला वेग येईल. गेल्या सोमवारी आरोपींनी एका अर्जाद्वारे आपण निर्दोष असल्याचे म्हणणे मांडले होते. मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने आता अभियोग चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आरोपींवर आरोप निश्चित झाल्याने हे प्रकरण लवकर हातावेगळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी आशीष मिश्रा याच्यासह अंकित दास, नंदन सिंह बिश्त, लतीफ काले, सत्यप्रकाश त्रिपाठी, शेखर भारती, सुमीत जयस्वाल, आशीष पांडे, लवकुश राणा, शिशुपाल, उल्हास कुमार, रिंकू राणा, वीरेंद्र कुमार शुक्ला आणि धमेंद्र बंजारा या तेरा आरोपींवरही न्यायालयीन कारवाई होणार आहे. आरोपींचे म्हणणे 15 डिसेंबरपर्यंत नोंदवून घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
आरोपी वीरेंद्र शुक्ला याच्यावर भारतीय दंड विधान अनुच्छेद 201 अनुसार आरोप निश्चित करण्यात आले असून इतर आरोपींवर भारतीय दंड विधान अनुच्छेद 147, 149, 302, 307, 326, 427 आणि 120 ब अनुसार आरोप निर्धारित करण्यात आले आहेत. तसेच आशीष मिश्रा याच्यासह काही आरोपींविरोधात बेकायदा शस्त्र बाळगण्याही आरोप ठेवण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
3 ऑक्टोबर 2021 या दिवशी लखीमपूर खीरी जिल्हय़ाच्या तिकोनिया या गावात शेतकरी आंदोलन होत असताना, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष मिश्रा टेनी याने आपली गाडी घातल्याने चार शेतकऱयांचा मृत्यू झाला. नंतर झालेल्या हिंसाचारात भाजपच्या दोन कार्यकर्त्यांसह चार जण ठार झाले होते. अशा प्रकारे या घटनेत आठ लोकांचा बळी गेला होता. या प्रकरणात आशीष मिश्रा याला मुख्य आरोपी बनविण्यात आले आहे. हिंसाचार घडविणाऱया 13 जणांवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. या घटनेनंतर काही आठवडय़ांनी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली होती. मधल्या काळात हे प्रकरण वरीष्ठ न्यायालयांमध्येही पोहचले होते. सुनावणी लवकर करण्याची सूचना वरीष्ठ न्यायालयांनी केली आहे. त्यावेळी हे प्रकरण देशभरात बरेच गाजले होते.