वृत्तसंस्था मेलबर्न
भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील भारतातर्फे सर्वाधिक 32 बळी मिळविणारा तर एकंदर सहाव्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सुपर 12 फेरीतील शेवटच्या सामन्यावेळी त्याने हा विक्रम नोंदवला.
रविवारी झालेल्या सामन्यात रविचंद्रन अश्विन भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. त्याने 4 षटकांत 22 धावा देत 3 बळी टिपले. त्याचा भेदक मारा व इतर गोलंदाजांकडून मिळालेल्या पूरक साथीमुळे भारताला या सामन्यात झिम्बाब्वेवर 71 धावांनी सहज विजय मिळविता आला. यावर्षीच्या स्पर्धेत अश्विनने आतापर्यंत 6 बळी मिळविले असून स्पर्धेतील त्याची एकूण बळींची संख्या 32 वर गेली आहे. 23 सामन्यांत 16.40 च्या सरासरीने व 6.32 च्या इकॉनॉमी रेटने त्याने हे बळी मिळविले आहेत. 11 धावांत 4 बळी ही त्याची या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
अष्टपैलू रवींद्र जडेजाने अश्विननंतर सर्वाधिक 21 बळी मिळविले आहेत. बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन या यादीत अव्वल स्थानी असून त्याने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 47 बळी मिळविले आहेत. त्यानंतर पाकचा शाहीद आफ्रिदी (39 बळी), लंकेचा लसिथ मलिंगा (38), पाकचा सईद अजमल (36), लंकेचा अजंता मेंडिस (35) यांचे क्रमांक लागतात.