राणी चन्नम्मा चौक ते खडक गल्ली कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम हाती : महापालिकेच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र बाजारपेठेंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहने चालविणे मुश्कील बनले आहे. खड्डे निर्माण झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याऐवजी सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बाजारपेठेतील बहुतांश रस्ते खराब झाले असून डेनेज आणि जलवाहिन्या घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरींमुळे रस्ते खड्डेमय बनले आहेत. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र खराब झालेल्या रस्त्याऐवजी सुस्थितीत असलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रकार सुरू आहे.
काकतीवेस रस्त्याची दुरवस्था
खडक गल्ली कॉर्नर ते शनिवार खूटपर्यंतच्या काकतीवेस रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे आणि चरी निर्माण झाल्या आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा, अशी सूचना महापालिकेला करण्यात आली होती. मात्र केवळ माती आणि चिपिंग घालून खड्डे बुजविण्यात आले आहेत.
या रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे. मात्र या रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी राणी चन्नम्मा चौक ते खडक गल्ली कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम शुक्रवारी हाती घेण्यात आले आहे. वास्तविक हा रस्ता चांगला असून या ठिकाणी खड्डे किंवा चरीही नाहीत.
खड्डेमय-धोकादायक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्य द्या
सुस्थितीतील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा सपाटा महापालिकेने चालविला आहे. ज्या ठिकाणी वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड जात आहे, अशा रस्त्यांची दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. मात्र सुस्थितीतील रस्त्यांचे डांबरीकरण करून निधीचा दुरुपयोग करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यापूर्वी खड्डेमय आणि धोकादायक रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.