ऑनलाईन टीम/तरुण भारत
आसाममध्ये पुराने (Assam Flood) हाहाकार माजवला आहे. येथील पूरपरिस्थिती अजूनही भीषण आहे. मंगळवारी पुन्हा पूरपरिस्थिती बिघडली. गेल्या २४ तासांत झालेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी पुन्हा शहरामध्ये घुसले. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. त्यामुळे अनेकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा, कोपिली आणि बेकी या प्रमुख नद्यांना मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. गेल्या २४ तासात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या १३९ वर गेली आहे. आतापर्यंत २४.९२ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.
गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे आणि पुराच्या पाण्याने एका लहान मुलासह आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांतील सुमारे २५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. कचारमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर धुबरी आणि मोरीगाव जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, कचार आणि चिरांग जिल्ह्यात एका लहान मुलासह आणखी तीन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.
६ एप्रिल रोजी राज्यात पहिल्यांदा (Assam) पूरपरिस्थिती निर्माण झाली. तेंव्हापासून आतापर्यंत संपूर्ण आसाममध्ये मृतांची संख्या १३९ वर गेली आहे. ८.६२ लाखांहून अधिक लोक त्रस्त असलेला कचर हा सर्वात जास्त प्रभावित जिल्हा आहे. त्यानंतर बारपेटा आहे, तिथे ५.७३ लाख लोकांना फटका बसला आहे. नागावमध्ये ५.१६ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे.
हेही वाचा : शिंदे गटाला सरकार पाडण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं; संजय राऊतांचा हल्लाबोल
सध्या, २,३८९ गावे पुराच्या पाण्याखाली आहेत, राज्यभरातील बाधित जिल्ह्यांमध्ये ८५,६७३ हेक्टरपेक्षा जास्त पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने २३ जिल्ह्यांमध्ये एकूण ६२७ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे सुरू केली आहेत. तिथे सध्या ४५,९१८ मुलांसह १,७६,२०१ लोक राहत आहेत. १४ जिल्ह्यांतील ११.०५ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि कोंबड्यांना महापुराचा फटका बसला आहे.