राजस्थानात मतदानाचा दिवस नजीक आला आहे. याचदरम्यान घटनात्मक पदांवरून राजस्थानात राजकारण सुरू आहे. यापूर्वी काँग्रेसने उपराष्ट्रपतींकडून राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांना निशाणा केले होते. आता याचदरम्यान उदयपूरमध्ये आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या एंट्रीवरून काँग्रेस आक्रमक झाला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि उदयपूरमधील उमेदवार गौरव वल्लभ यांनी राज्यपाल कटारिया यांच्या उदयपूर दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. यावरून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हा दौरा म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसने यापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजस्थान दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले होते. तर राज्यपाल कटारिया यांच्या उदयपूर दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
आसामचे राज्यपाल कटारिया हे घटनात्मक पदावरआहेत. अशा व्यक्तींनी राजकीय घडामोडींमध्ये सामील होऊ नये. राज्यपाल कटारिया हे उदयपूरमधील भाजप उमेदवार ताराचंद जैन यांच्या समर्थनार्थ बैठक घेण्यासाठी येत आहेत. हा प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचे गौरव वल्लभ यांनी म्हटले आहे.