अनेक गावे पूरक्षेत्रात ः राजस्थानमध्ये मान्सूनपूर्व बरसला
गुवाहाटी, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात पावसाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. कुठे पूर, कुठे हलका पाऊस आणि अनेक राज्ये अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. आसाम आणि मेघालयमध्ये पुरामुळे आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे नद्या आणि नाले तुंबले आहेत. राजधानी दिल्लीला अजूनही पावसाची प्रतिक्षा असून या भागात एक-दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्मयता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 62 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी मेघालयमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांमध्ये सुमारे 40 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाममधील 28 जिल्हय़ांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. महापुराच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी लष्कराकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, सुबनसिरी नदीच्या पाण्यामुळे अरुणाचल प्रदेशातील धरण पाण्याखाली गेले आहे. मणिपूरमधील अनेक जिल्हय़ांमध्ये पूरसदृश परिस्थिती असून, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाममध्ये 32 जिल्हय़ांमध्ये 31 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत, तर सुमारे 1.56 लाख लोक 514 मदत शिबिरांमध्ये आहेत. पुरामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे. तसेच ब्रह्मपुत्रा, गौरांग, कोपिली, मानस आणि पगलाडिया नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्मयाच्या चिन्हाच्या वर आहे. आसाम सरकारने पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या लोकांसाठी गुवाहाटी आणि सिलचर दरम्यान विशेष हवाई वाहतूक व्यवस्था केली आहे. दक्षिण आसाम, त्रिपुरा आणि मिझोरामला जोडणाऱया रस्त्याचा काही भाग भूस्खलनात वाहून गेल्यामुळे रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.
कडक उन्हापासून दिल्लीकरांना दिलासा
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिल्लीतील तापमानात घट झाली आहे. किरकोळ पाऊस आणि दमट वातावरणामुळे दिल्लीतील नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. 21 जूनपर्यंत राजधानीत ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय मान्सून 27 जून किंवा एक-दोन दिवस आधी दिल्लीत पोहोचण्याची शक्मयता आहे.
मध्यप्रदेशातही पावसाने जोर धरला
मध्यप्रदेशात मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडला आहे. भोपाळ, जबलपूर, सागर विभागातील बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. आता येत्या 48 तासांत या भागातही मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. भोपाळमध्ये रविवारी सकाळीही अधूनमधून पाऊस सुरू झाला. इंदूरमध्येही बहुतांश भागात पाऊस झाला. 28 जूनपासून संपूर्ण राज्यात मान्सूनचा पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राजस्थानमधील 15 जिल्हय़ांमध्ये अलर्ट
राजस्थानमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे नद्या आणि नाले तुंबल्यामुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. जयपूरसह अनेक जिह्यांमध्ये शनिवारी रात्री उशिरापासून पाऊस कोसळत आहे. टोंक, करौली, श्रीगंगानगर, हनुमानगड, जयपूर, जयपूर शहर, जोधपूर, अलवरसह 15 जिल्हय़ांमध्ये हवामान केंद्राने अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. बिहारमधील अनेक जिल्हय़ांमध्येही मुसळधार पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशात यंदा मान्सून व्यापण्यास काहीसा विलंब होणार असल्याचाही अंदाज आहे.