पोलीस करत आहेत तपास
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूमध्ये भाजप नेते बालचंद्रन यांची हत्या झाली आहे. चेन्नईच्या चिंताद्रीपेटमध्ये तीन अज्ञात जणांनी चाकूने वार करत त्यांची हत्या केली आहे. बालचंद्रन हे भाजपच्या अनुसूचित जाती/जमात विषयक शाखेचे जिल्हाध्यक्ष होते. बालचंद्रन यांना मागील काही काळापासून हत्येची धमकी मिळत होती. याचमुळे त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली होती. बालचंद्रन हे सुरक्षा अधिकारी बालकृष्ण यांच्यासोबत शहरातील एका भागात मित्रांसोबत बोलत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला.
बालचंद्रन हे मित्रांसोबत बोलत असताना त्यांच्या सुरक्षेकरता तैनात अधिकारी चहा पिण्यासाठी दुसरीकडे गेला होता. त्याचवेळी भाजप नेत्याची हत्या करण्यात आली. हत्येच्या घटनेवेळी तेथे उपस्थित लोकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती चेन्नई पोलीस आयुक्त शंकर जयवाल यांनी दिली आहे. आरोपींना पकडण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
तामिळनाडूतील विरोधी पक्षनेते ई.के. पलानिसामी यांनी राज्य पोलीस दलाच्या अपयशावर टीका केली ओ. 20 दिवसांमध्ये 18 हत्या झाल्या आहेत. अशाप्रकारच्या घटनांमुळे चेन्नईला एक जीवघेणे शहर ठरविले जात आहे. लोकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे पलानिसामी यांनी म्हटले आहे.
या घटनेवरून चेन्नईमध्ये भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे का हत्यासत्रांचे केंद्र असा प्रश्न भाजप नेते कारू नागराजन यांनी उपस्थित केला आहे.