हत्येच्या घटनेमुळे जयपूरमध्ये खळबळ : बिश्नोई टोळीवर संशय
वृत्तसंस्था/ जयपूर
राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोगामेडी यांची ही हत्या त्यांच्याच घरात झाली आहे. अज्ञात युवकांनी गोगामेडी आणि त्यांचे सुरक्षारक्षक नरेंद्र यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. जयपूरचे पोलीस आयुक्त बीजू जॉर्ज जोसेफ यांनी या घटनेची पुष्टी दिली आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.
हत्येचा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी सीसीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. गोळीबारानंतर गोगामेडी यांना परिसरातील लोकांनी त्वरित रुग्णालयात हलविले होते, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. मारेकऱ्यांची ओळख पटविण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखलच्या गोळीबारात एक मारेकरी नवीन सिंहचा मृत्यू झाला आहे. तर मारेकरी एका व्यक्तीची दुचाकी हिसकावून घेत फरार झाले आहेत. मारेकी सुरक्षारक्षकाशी झालेल्या संभाषणानंतर घरात दाखल झाले होते. गोगामेडी यांच्या सुचनेनंतरच त्यांना घरात जाऊ दिले गेले होते असे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले.
गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ट्विट केला आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येचे वृत्त कळताच धक्का बसला. यासंबंधी पोलीस आयुक्तांकडून माहिती मिळविली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची सूचना केल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे.
बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून काही महिन्यांपूर्वी गोगामेडी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यासंबंधी त्यांनी जयपूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. बिश्नोई टोळीच्या संपत नेहराकडून धमकी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. आता हत्येनंतर बिश्नोई टोळीचा सदस्य रोहित गोदाराने जबाबदारी स्वीकारली आहे. गोदारा विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटी जारी केली आहे. विदेशात राहून तो लॉरेन्सच्या इशाऱ्यावर गुन्हेगारी कारवाया घडवून आणत आहे.
कोण होते गोगामेडी?
सुखदेव सिंह गोगामेडी हे राजपूत समुदायाच्या सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. गोगामेडी यांनी 2013 मध्ये करणी सेनेत प्रवेश केला होता. राजपूत समुदायात ते अत्यंत लोकप्रिय होते. करणी सेना संघटनेत वाद निर्माण झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेना नावाने स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. पद्मावत चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान या संघटनेच्या सदस्यांनी तोडफोड केली होती. पद्मावत चित्रपट आणि गँगस्टर आनंदपाल एन्काउंटर प्रकरणानंतर राजस्थानात झालेल्या निदर्शनांमुळे गोगामेडी हे चर्चेत आले होते.