कडक बंदोबस्त तैनात ः 2 मार्चला मतमोजणी
कोहिमा / वृत्तसंस्था
मेघालय आणि नागालँड येथील विधानसभा निवडणुकींसाठी सोमवारी मतदान होत आहे. ही दोन्ही राज्ये आणि इतर काही राज्यांमधील विधानसभांच्या काही जागांसाठीही याचेवळी पोटनिवडणूक होत आहे. त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी यापूर्वीच मतदान झाले आहे. सर्व राज्यांमध्ये मतमोजणी गुरुवार, 2 मार्च रोजी होणार आहे.
नागालँडमध्ये 60 पैकी 59 विधानसभा मतदारसंघात कडेकोट बंदोबस्तात सोमवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू होणार आहे. या निवडणुकीत 183 उमेदवारांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होईल. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. शनिवारी संपलेल्या प्रचारादरम्यान सर्व प्रतिस्पर्धी पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी डागल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.
मेघालयात 369 उमेदवार
मेघालयात होणाऱया विधानसभा निवडणुकीत एकूण 369 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 36 महिला आहेत. राज्यातील 59 विधानसभा मतदारसंघातील 3,419 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होणार असून सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. मेघालयातील 60 विधानसभा मतदारसंघांपैकी 36 मतदारसंघ खासी, जैंतिया हिल्स प्रदेशात येतात तर 24 गारो हिल्स प्रदेशात येतात. राज्यात 21 लाखांहून अधिक मतदार (21,75,236) असून त्यापैकी 10.99 लाख महिला आणि 10.68 लाख पुरुष मतदार आहेत. मेघालयमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. राज्यात सुमारे 81,000 मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील एकूण 3,419 मतदान केंद्रांपैकी 120 केंद्रांवर महिलांकडून व्यवस्थापन केले जाणार आहे. निवडणूक आयोगाने मेघालयमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 119 कंपन्या तैनात केल्या आहेत.
संमिश्र सरकारे
सध्या मेघालय आणि नागालँड या दोन्ही राज्यांमध्ये संमिश्र सरकारे आहेत. भारतीय जनता पक्ष या दोन्ही सरकारांमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या निवडणुका त्याच्यासाठी अतिशय महत्वाच्या मानल्या जात आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे स्वबळाचे सामर्थ्य मर्यादित असले तरी त्याने महत्वाच्या स्थानिक पक्षांशी युती केली आहे. एकेकाळी ही दोन्ही राज्ये काँगेसचा बालेकिल्ला मानली जात होती. तथापि, सध्याच्या काळात तेथे प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत.