ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा देऊन मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर शिंदे आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री(CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री (Deputy CM Devendra Fadnavis) म्हणून शपथ घेतली. यानंतर राज्यपालांनी विधानसभेचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे (Congress) ११ आमदार अनुपस्थित होते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.
विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली होती. सभागृहात आमदारांची उपस्थिती राहील याची खबरदारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने घेतली होती. मात्र, काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार उशिराने पोहोचले. त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे, याचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. तर दोन जण पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते. या ९ जणांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हे ही वाचा : ‘माफिया’ मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन; किरीट सोमय्यांचे खळबळजणक ट्विट
दरम्यान, मतदानानंतर अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आभार मानले होते. ‘अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला सहकार्य करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली होती. मात्र, आता या संदर्भात पक्षाकडून आमदारांना जाब विचारण्यात आला आहे.