ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसच्या (congress chintan shivir) चिंतन शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (soniya gandhi) पक्षाच्या या शिबिराला उपस्थित आहेत. त्यांनी पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी भाजप (BJP) आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात ध्रुवीकरणाचं वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी सोनिया गांधींनी केला.
नवसंकल्प चिंतन शिबीरच्या निमित्ताने भाजप, आरएसएसमुळे (RSS) देशासमोर निर्माण झालेल्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचं यावेळी सोनिया गांधींनी म्हटलं. तसेच सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अल्पसंख्याकांवर अत्याचार करत असून महात्मा गांधींच्या (mahatma gandhi) मारेकऱ्यांचा गौरव करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केला.
“पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ वेदनादयीपणे स्पष्ट झालं आहे. याचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवणं तसंच लोकांना नेहमी भीती आणि असुऱक्षित स्थितीत राहण्यात भाग पाडणं आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करणे”.
“संघटनेत बदल ही काळाची गरज आहे, आपल्या कामाची पद्धत बदलण्याची गरज आहे. आम्हाला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटना ठेवावी लागेल, पक्षाने आम्हाला खूप काही दिले आहे आणि परतफेड करण्याची वेळ आली आहे, ” असे सोनिया गांधी म्हणाल्या.