वार्ताहर/ खानापूर
खानापूर तालुक्मयाच्या अग्नेय भागातील प्रमुख गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोधोळी परिसरातील शेतवडीत 14 हत्तींच्या कळपाने धुडगूस घालून ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बुधवारी सकाळी गोधोळी परिसरातील यंटापूर शेतवडीत 13 मोठे हत्ती व एक पिल्लू उसाची मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याचे शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडले. ही बातमी गावभर पसरली. गावातील 200 हून अधिक जण यंटापूर शेतवडीत जमा झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात आरडाओरड केली. तरीही बराचवेळ या हत्तीने उसाचा फड सोडला नाही. पोटभर खाऊन त्यानंतर ते जंगलाच्या दिशेने निघून गेले. हत्तींना हुसकावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर व कुत्र्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न हत्तींकडून करण्यात येत होता. नागरिक सतर्क राहिल्याने कोणालाही इजा पोहचली नाही. परंतु यात ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोधोळी येथील दयानंद शिंदे, नवीन चोळणेकर, पेदरू चोळणेकर यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महिन्यापूर्वीसुद्धा या भागात हत्तींचा कळप ऊस पिकाच्या शेतवडीत आला होता. त्यावेळी अशोक जोगळेकर, रामचंद्र राऊत, संजू चोळणेकर, माऊती हळब, बाबू हळब, देवेंद्र हळब, माऊती बिडकर, शिवाजी कदम, मंजुळा बिर्जे आदींसह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस व भात पिकाचे नुकसान करण्यात आले होते. दरवषी हत्तींकडून या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी संतापला आहे.
तसेच चुंचवाड-करिकट्टी येथेही नुकसान करण्यात आले होते. 11 व 12 डिसेंबर दरम्यान करीकट्टी, भुरूणकी व चुंचवाड परिसरातील तीसहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतवडीतील ऊस पिकांचे नुकसान हत्तींच्या कळपांकडून करण्यात आले होते. त्या वेळेला त्या कळपाने ऊस, भातपिकासह नारळ व केळीच्या झाडांचे नुकसान केले होते. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी फटाके वाजवून हत्तींच्या कळपाला हुसकावून लावले होते. महिनाभर हत्तींचा मागमूस नव्हता. पण अचानकपणे बुधवारी पहाटे हत्तींचा कळप शेतवडीत दिसल्याने उसाची पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.