शिराळा / वार्ताहर
प्रहार संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आत्मक्लेष समाधी आंदोलन करण्यात आले. गेल्या सरकारने एक रक्कमी एफआरपीचे तुकडे काढण्याचा अध्यादेश संमत केला. तसेच साखर सम्राट यांच्याकडून केली जाणारी काटेमारी व शेतकऱ्यांची लुबाडणूक याच्या विरोधात प्रहार संघटना सांगली जिल्हा यांच्यावतीने ऊसाच्या शेतात स्वतःला गाडून घेऊन आत्मक्लेष समाधी आंदोलन केले.
यावेळी साखर सम्राटांना एक एकरकमी एफआरपी नदिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाला त्याच्या घामाचे दाम मिळेपर्यंत प्रहार संघटना रणांगणात राहील. शिराळ्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेऊनशासनाच्या विचाराधीन हा विषय आणण्याचे कबूल केले. साखर कारखान्यांसोबत मिटिंग लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांची शिकलेली पोरं साखर सम्राटांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. तर ते आपल्या बापाचे घामाचे दाम मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, तालुकाध्यक्ष बंटी नांगरे -पाटील, उपतालुकाप्रमुख दिग्विजय पाटील, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रायसिंग पाटील, मांगले विभागप्रमुख ओंकार पाटील, प्रहार युवक वाळवा तालुकाप्रमुख ओंकार वरुठे, प्रहार संघटना वाळवा तालुकाप्रमुख विद्यार्थी प्रमुख, प्रतिक पाटील शिराळा शहरप्रमुख अजिंक्य कोळी ओमकार पानसे आदी शेतकरी व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.