प्रतिनिधी /पुणे
आचार्य अत्रे यांचे स्मारक मुंबईत होणे गरजेचे आहे. हे स्मारक सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
साहित्यसम्राट प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे स्मृती प्रति÷ानतर्फे न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. बाबुराव कानडे, वसंतराव कुलकर्णी, डॉ. शाल्मली कुलकर्णी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी कऱहेचे पाणी बृहत् आत्मचरित्र आचार्य अत्रे पुरस्कार’ उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांना, ‘वक्ता दशसहस्त्रsषु आचार्य अत्रे पुरस्कार’ खासदार श्रीनिवास पाटील यांना, ‘यशस्वी दिग्दर्शक आचार्य अत्रे पुरस्कार’ नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे यांना, तर डॉ. शर्मदा कलबाग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘सिद्धहस्त व्यंगचित्रकार आचार्य अत्रे पुरस्कार’ ‘तरुण भारत’चे अर्कचित्रकार भरत जगताप यांना प्रदान करण्यात आला.
ऍड. कानडे यांनी मुंबईत आचार्य अत्रे यांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा प्रास्ताविकात व्यक्त केली. त्याचा धागा पकडून राम नाईक म्हणाले, आचार्य अत्रे यांचे स्मारक मुंबईत असायलाच हवे. आज वेगवेगळय़ा संकटांतून आपण जात आहोत. अत्रे यांचे स्मारक मुंबईत झाले, तर त्यातून संकटांशी लढण्याची प्रेरणा आपल्याला मिळू शकेल. त्याचबरोबर मार्गही सापडतील.
श्रीनिवास पाटील म्हणाले, ऍड. कानडे हे तब्बल 53 वर्षांपासून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक व साहित्यिक विश्वात आचार्य अत्रे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे अत्रे यांचे स्मारक मुंबईत झालेच पाहिजे. त्यासाठी एखादी समिती स्थापन करण्यात यावी. त्यामार्फत हे स्मारक साकारण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. पंचवीशे एक रुपयाचा धनादेश आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.