‘बस्स, आता पुरे झाले!’ : कोलकाता बलात्कार प्रकरणावर राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली नाराजी
विकृतीला एकत्रितपणे तोंड देण्याची गरज!
आता भारताने आपल्या इतिहासातील घटनांचा विसर न पाडता अशा विकृतीला पूर्ण क्षमतेने एकत्रितपणे तोंड देण्याची वेळ आली आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वसमावेशकपणे सामना करूया.
– द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मोठे वक्तव्य आले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या घटनेबाबत भाष्य करताना ‘मी खूप निराश आणि घाबरले आहे’ असे सांगितले. तसेच महिला-मुलींवर होणारे गुन्हे यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत असे नमूद करत या प्रकरणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कोलकाता येथील घटनेवर आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी प्रथमच भाष्य केले. कोणत्याही सुसंस्कृत समाजात महिलांवरील अशा अत्याचारांना परवानगी दिली जाऊ शकत नाही.
समाजही प्रामाणिक, निष्पक्ष आणि आत्मपरीक्षण करणारा असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. अनेकदा निंदनीय मानसिकता असलेले लोक महिलांना कमी सामर्थ्यवान, कमी सक्षम, कमी हुशार समजतात. त्यातूनच असे अत्याचार आणि हत्येसारखे प्रकार घडतात. कोणताही सुसंस्कृत समाज मुली आणि बहिणींवर असा अत्याचार होऊ देऊ शकत नाही. अशी विचारसरणी असणारे लोक स्त्रीला एक वस्तू म्हणून पाहतात. भीतीपासून मुक्ती मिळण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर गेल्या 12 वर्षांत लोक ही घटना विसरून गेले. हा सामूहिक स्मृतिभ्रंश योग्य नाही, असेही त्या पुढे म्हणाल्या.
घटनेचे अजूनही देशभर पडसाद
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सेवेत असणाऱ्या एका ज्युनियर डॉक्टरवर 9 ऑगस्ट रोजी बलात्कार झाला होता. यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारत डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत कायदा करण्याची मागणीही केली आहे. अजूनही कोलकाता बलात्कार प्रकरणाविरोधात बंगालसह देशभरात निदर्शने होत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याच्यासह माजी प्राचार्यांनाही अटक केली आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने त्याचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. गेल्या 20 दिवसात या तपासात प्रगती झाली असली तरी कोणत्याही ठोस उपाययोजना किंवा निर्णय झाला नसल्याने जनतेमध्ये अजूनही संताप असल्याचे दिसून येत आहे.